| अलिबाग | वार्ताहर |
‘स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग’साठी अलिबाग नगरपरिषदेकडून नेहमीच प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्या माध्यमातून शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान, अलिबाग नगरपरिषद व इकोसत्व इन्व्हायरमेंटल सोल्युशन प्रा.लि.कं. यांच्या संयुक्त विद्यमाने द इंक्युबेशन नेटवर्क व सेकंड म्युस यांच्या सहकार्याने शनिवारपासून अलिबाग शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्याकरिता जनजागृतीचे कार्य सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी सर्वप्रथम नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना मुंबई येथे नेल्सन मंडेला नोबेल पीस व मानद डॉक्टरेट या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रशांत नाईक यांच्या हस्ते ‘स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग’ अभियानाच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी हा उपक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच नागरिकांनी आपला कचरा वर्गीकरण करून देण्याचे आवाहन केले. यावेळी पुढील सात महिन्यांमध्ये कचर्याच्या वर्गीकरणाबद्दल जनजागृती, डम्पिंग पॉईंट बंद करणे, कचर्याची योग्य प्रकारे प्रक्रिया विल्हेवाट लावणे, झिरो वेस्ट सिटी करण्याबाबत सविस्तर चर्चा करून व्हिजन ठरवण्यात आले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, नगरसेविका संजना किर, ऋषाली ठोसर, अश्विनी पाटील, नगरसेवक अनिल चोपडा, राकेश चौलकर, महेश शिंदे व न.प. इंजिनिअर दीक्षा सिरसट, न.प. वर्ग नामदेव जाधव, घंटागाडीवरील चालक, कर्मचारी, शहरातील नागरिक, महावीर चौकातील रहिवासी, व्यापारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत ‘स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग’ या घोषवाक्याचा नारा देऊन अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ईकोसत्वचे प्रतिनिधी संतोष राखेमल्लु, नदिम खान, पूजा पिंगळे, नयना ढोरे, रेश्मा ढावरे उपस्थित होते.
नागरिकांना आवाहन
ईकोसत्व प्रकल्प प्रमुख संतोष राखेमल्लु व नदिम खान यांनी कचरा वर्गीकरणाचे चार प्रकार व त्यामध्ये येणारे प्रमुख घटक याविषयी सविस्तर माहिती दिली. कचर्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य म्हणजे ओला, सुका, हानिकारक तसेच ई-कचरा वर्गीकरणाचे फायदे तसेच कचर्यामुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम व पर्यावरणाची हानी याबाबत सविस्तर माहिती दिली.