90 टक्के दिव्यांगांकडून स्मार्ट ओळखपत्राचा वापर
| अलिबाग | प्रतिनिधी |
कागदी ओळखपत्र पावसाळ्यात भिजणे, फाटून जाणे असा प्रकार घडत असल्याने दिव्यांगाना ते हाताळणे त्रासदायक ठरत होते. मात्र स्मार्टकार्ड उपलब्ध झाल्याने त्यांना आता ते हाताळणे सोपे झाले आहे. त्याचा वापर वाढल्याने कागदी ओळखपत्र कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.
एसटी प्रवासात सवलतीसाठी समाजकल्याण विभागाकडून दिव्यांगाना कागदी ओळखपत्र दिले जात होते. ते हाताळताना त्यांना अडचणी निर्माण होत होत्या. दिव्यांगाचा हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारने 2018 पासून ऑनलाईन पध्दतीने ओळखपत्र (युडीआयडी) देण्यास सुरुवात केली. रायगड जिल्हयात त्याची अंमलबजावणी सुरु झाली. जिल्ह्यात आजपर्यंत सुमारे 22 हजारहून अधिक दिव्यांगांना युआयडी कार्ड वाटप करण्यात आले. सवलतींकरिता व इतर फायद्यांसाठी हे ओळखपत्र ग्राहय धरण्यात आले. जिल्ह्यामध्ये स्मार्टकार्डचा वापर दिव्यांग एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी करीत आहेत. हे ओळखपत्र हाताळणे सोपे असल्याने कागदी ओळखपत्रा ऐवजी या स्मार्टकार्डचा वापर वाढू लागला आहे. जिल्ह्यामध्ये 90 टक्के दिव्यांग या स्मार्टकार्डचा वापर करीत आहेत. उर्वरित दहा टक्के अजूनही कागदी ओळखपत्राचा वापर करीत आहेत.
एसटीतून प्रवास करताना दिव्यांगांनी स्मार्टकार्डबरोबरच प्राप्त झालेली रंगीत प्रत सोबत ठेवणे गरजेचे आहे. यामुळे दिव्यांगासोबत असलेल्या व्यक्तीला एसटीच्या सवलतीचा फायदा घेता येणार आहे.
अजय वनारसे, आगार व्यवस्थापक, अलिबाग