। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
वेतनवाढ, रखडलेली देणी, महागाई भत्त्याचा व घर भाड्याचा फरक आणि एसटीचे विलिनीकरण या तीन मुद्यांवर महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापुर्वी प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचार्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शासनाने एसटी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. तसेच दिवाळीची भेट म्हणून अधिकार्यांना 5 हजार रूपये तर कर्मचार्यांना 2500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री अनिल परब यांनी सोमवारी केली. मात्र हा निर्णय मान्य नसल्याने कर्मचार्यांनी मंगळवारी (दि.27) उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कामगार संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष विलास खोपडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अनेक समस्यांच्या विळख्यात आहे. त्यातच दिवाळी उंबरठ्यावर असतानाच एसटी कामगारांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 27 ऑक्टोबरपासून आर्थिक आणि प्रलंबित महत्वाच्या प्रश्न सोडवण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरु होणार आहे. त्यासंदर्भातील निवेदन संयुक्त कृती संमितीच्या वतीने विभाग नियंत्रकांना सोमवारी (दि. 25) देण्यात आले आहे.
आंदोलन राज्यस्तरावर होणार असल्याची माहिती रायगड कामगार संघटनेचे अध्यक्ष विलास खोपडे यांनी दिली आहे. 28 तारखेपासून आगार स्तरावर सर्व कर्मचारी उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पगार वाढीचा दर 3 टक्के आहे; मात्र आम्हाला 2 टक्केच दिला जातो. घरभाडे भत्ता 7 टक्के, 14 टक्के आणि 21 टक्के आहे, तो 8 टक्के, 16 टक्के आणि 24 टक्के झाला आहे. मात्र आम्हाला जुन्याच दराने दिला जात आहे. याशिवास महागाई भत्याचा सरकारी दरबारी 28 टक्के दर असून आम्हाला फक्त 12 टक्के इतका फरक मिळत आहे. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये नाराजी आहे. अशातच शासनाने महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्याच्या निर्णय घेऊन आमची चेष्टा केली आहे.
विलास खोपडे- कामगार संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष
हा विषय जिल्हास्तराचा नाही. कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्या शासन स्तरावर आहेत. त्याबाबत निर्णय मी निर्णय घेऊ शकत नाही. मात्र त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल.
अनघा बारटक्के- विभाग नियंत्रक रायगड