परशुराम उपरकर यांची सूचना
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
राज्यात वारंवार घडणार्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर निव्वळ पोकळ घोषणा न करता, या घटनांमधून धडा घेत प्रत्येक रूग्णालयांची संरचनात्मक तपासणी म्हणजेच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना मनसे सरचिटणीस तथा माजी आ. पशुराम उपरकर यांनी केली आहे. कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
परशुराम उपरकर म्हणाले की, सावित्री पूल कोसळल्यानंतर केंद्राने ब्रिटिशकालीन पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची घोषणा केली होती. अशीच घोषणा राज्याने कोविड काळातील रुग्णालयांना लागलेल्या आगीनंतर रुग्णालयांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची केली; मात्र अहमदनगर जिल्हातील घटनेनंतर शासनाच्या या घोषणा निव्वळ पोकळ होत्या, असे सिद्ध झाल्याचे दिसत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये इलेक्ट्रिक स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या घोषणा वारंवार झाल्या; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
उपरकर पुढे म्हणाले की, अशा घटनांनंतर शासन मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करते; पण गेलेला माणूस परत येत नाही. अशा घटनांमध्ये जनतेचा नाहक बळी जात आहे. आज जिल्ह्यातील रस्त्यांचीही तशीच परिस्थिती आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ घोषणा करतात; मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. जिल्ह्यात अजूनही ब्रिटिशकालीन पूल आहेत; मात्र याबाबत अजूनही स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. याचे उदाहरण म्हणजे नरडवे रस्त्यावरील नाटळचा मल्हारी नदीचा पूल. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते का? स्थानिक लोकप्रतिनिधी जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
याशिवाय, आता या स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जनतेने जाब विचारण्याची वेळ आलेली आहे, असे जनतेला सूचवत निवडणुकीच्या वेळी तुमच्या घरात येत असताना प्रथम त्यांना मागची आश्वासने पूर्ण झाली का? याची आठवण करून देण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
केंद्रात किंवा राज्यात सत्तेत येणारे सरकार नेहमीच जाहीरनामे काढतात; मात्र त्यांना सोयीस्कर त्याचा विसर पडत असतो. ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जाते, अशा खरमरीत शब्दांत उपरकर यांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत.
एसटी कर्मचार्यांची मागणी योग्यच
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला तारण्याची गरज आहे. आज सर्वसामान्याला खाजगी वाहन खरेदी करणे परवडणारे नाही. त्यामुळे एसटी हे एकमेव वाहन आहे. या एसटी महामंडळाला या सरकारने स्वतःच्या कक्षेत घ्यायला हवे. त्यांची मागणी योग्यच असल्याचे प्रतिपादन मनसे सरचिटणीस तथा माजी आ. पशुराम उपरकर यांनी केले आहे.