तळवली शाळेच्या शिक्षकांचे मोलाचे योगदान
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
मराठी शाळा आता डिजिटल होत चालल्या असून, विद्यार्थ्यांना घडविण्याचे मोलाचे योगदान शिक्षक वर्ग करीत आहे. शाळेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचे वडील हे शेतकरी असल्यामुळे शिक्षण समवेत घरच्या घरी भाजीचा मळा कसा पिकवायचा यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत आहे. या उद्देशाने या शाळेमध्ये वृक्षांचे महत्त्व, आपल्या सभोवताली असलेल्या जागेमध्ये भेंडी, वांगी, दुधी, मिरची, पालक, टोमॅटो, कोथिंबीर, मेंथी, मुळा, काकडी तसेच कडधान्ये पिकविण्याचे प्रशिक्षण मुख्याध्यापक मस्तान बोरगे, उपशिक्षक सुरेश मांडे हे मुलांना देत आहे.
सकाळी, सायंकाळी प्रत्येक वेळी हातपाय धुण्यासाठी पाण्याचा वापर होतो. मात्र, हेच पाणी एका ठिकाणी जमा करुन यापासून भाजीचे पीक घेतले जाऊ शकते. त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आहारात वापरु शकतो, या विचारांतून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासमवेत भाजीपाला कसा लागवड करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले जात आहे. विद्यार्थ्यांना रोज जेवण शाळेत मिळत असते, मात्र आपल्या रोजच्या जेवणात पालेभाज्यांचा समावेश असावा या विचारांतून येथे भाजीपाला लागवड केली आहे.
आपल्या अल्पशा जागेमध्ये रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रीय खताचा वापर करून ही पिके घेतली तर मानवाला कोणतेही अपायकारक होऊ शकत नाही. मात्र, जास्त उत्पन्न आणी कमी वेळामध्ये घेतल्यामुळे यांच्यापासून विविध आजार निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासमवेत सेंद्रिय खताच्या माध्यमातून भाजीपाला लागवड करण्याचे मार्गदर्शन करीत आहे. शालेय पोषण आहारामध्ये या भाज्याचा समावेश असून, दैनंदिन जीवनात भाजीपाल्यांचा प्रश्न मार्गी लागत आहे.
शैक्षणिक अभ्यासाच्या माध्यमातून खत कसे तयार करायचे यांचे मार्गदर्शन दिले जात आहे. या शाळेच्या सभोवताली अनेक वृक्ष असून, यांचा पडलेला पाला कुजून खताची निर्मिती केली जात आहे. शिवाय, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेसाठी ठेवण्यात आलेले पाणी कालव्याच्या माध्यमातून लागवड केलेल्या भाजीपाल्यापर्यंत पोहोचत असून, याचाही सदुपयोग होत आहे.
–मस्तान बोरगे,
मुख्याध्यापक, राजिप शाळा तलवली
