| महाड | वार्ताहर |
विद्यार्थी कोणत्या विषयात हुशार आहेत, कोणत्या विषयात कमकुवत आहेत, कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात मुलांना एखादा विषय अवघड अथवा सोपा वाटतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि राज्य, जिल्हा व तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील स्थिती समजण्यासाठी रायगड जिल्ह्यात तीन नोव्हेंबरला राज्य शैक्षणिक संपादक सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार असून जिल्ह्यातील शाळांमध्ये याची तयारीही पूर्ण झाली आहे. काही विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड जातो तर काहींना तो अतिशय सोपा वाटतो. कित्येकदा मातृभाषा असलेली मराठी विषय देखील बहुसंख्य विद्यार्थ्यांना कठीण जातो. विविध इयत्तेतील विद्यार्थी अशा सोप्या आणि कठीण विषयातून आपले शिक्षण पूर्ण करतात, परंतु यातून मार्ग काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पाया मजबूत राहण्यासाठी व त्यांच्या करिअरच्या दृष्टीने भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार शिक्षण क्षेत्रात विविध उपाययोजना करीत आहे. विविध शैक्षणिक धोरणे, मूल्यमापन पद्धती व अभ्यासक्रम आखले जात आहेत. अशा विविध मार्गांचा अवलंब करून भावी पिढी तयार केली जावी, हा या मागचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून हे शैक्षणिक सर्वेक्षण केले जाणार आहे. एकविसाव्या शतकात जग वेगवान होत असतानाच देशाची प्रगती देखील कशी होईल, यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. परीक्षेच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे व त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. जे विद्यार्थी एखाद्या विषयात मागे पडतात त्यांची पडताळणी करून त्या दृष्टीने कृती कार्यक्रम तयार करून या मुलांनाही हुशार मुलांसोबत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र पेपर रायगड जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये तिसरी, सहावी व नववीमधील विद्यार्थ्यांसाठी तीन नोव्हेंबरला राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षणअंतर्गत परीक्षा घेतली जाणार आहे. मुलांना लेखी प्रश्नपत्रिका दिल्या जाणार असून प्रत्येक वर्गासाठी वेगळा पेपर असेल. यामध्ये विद्यार्थ्यांना भाषा, गणित आणि परिसर अभ्यासक्रम तसेच नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा, गणित व समाजशास्त्र याविषयी परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
विषयनिहाय तपशीलवार विश्लेषण परीक्षांमधून विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी तपासली जाणार आहे. प्रत्येक भाग तसेच तालुक्यानुसार कोणती मुले कोणत्या विषयात प्रगत अथवा मागे आहेत, याचाही सर्व्हे केला जाणार आहे. सर्वेक्षणाच्या वयानुसार, राज्यनिहाय, लिंगनिहाय व विषयनिहाय तपशीलवार विश्लेषण केले जाणार असून यावर आधारित अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये या परीक्षांची तयारी झाली असून विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.