ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड येथे धरमतर खाडीच्या पश्चिमेस व गावांच्या पूर्वेस फुटलेला बांध बांधण्यासाठी आवश्यक असलेला पोहोच रस्ता तयार करण्यासाठी कार्यकारी अभियंता एमआयडीसी यांनी त्याचा अहवाल 9 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बेनाडे यांनी दिले होते. त्यानंतर दि. 6 सप्टेंबर रोजी एमआयडीसी, वनखाते, महसूल यांनी संयुक्तरित्या पाहणी करुन सर्व्हेक्षण केले. त्यामुळे ग्रामस्थांना समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, या सर्व्हेक्षणावेळी एमआयडीसी अभियंता प्रवीण कदम, वनखाते कनकेश्वर रेंज श्री. जाधव, फॉरेस्ट गार्ड स्नहेन म्हात्रे, तहसील प्रतिनिधी श्रीमती खोत, तलाठी शहापूर, सर्कल शहापूर यांच्यासह शहापूर, धेरंड ग्रामस्थ बबन म्हात्रे, नंदन पाटील, अनिल पाटील व 50 हून अधिक महिला उपस्थित होत्या. दरम्यान, गट क्र. 77, 78,79, व 80 असा सरळ पोहोच रस्त्याचे डिमार्केशन खारभूमीचा नकाशा वापरून सर्व्हेक्षण केले. जेथे नाला आहे तेथे पाईप टाकायचे ठरले. एमआयडीसीला श्रमिक मुक्ती दलाने या रस्त्याचा प्रस्ताव व गरज असल्याचे पत्र देण्याचे ठरले. वनखात्यांनी अहवाल दिल्यानंतर प्रत्यक्ष पोहोच रस्त्यावर खडीमिश्रित माती टाकण्यासाठी जेएसडब्ल्यू कंपनीस एमआयडीसीने कंपनीला ना हरकत पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देणार असल्याचे ठरले. रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसीलदार मीनल दळवी, एमआयडीसी कार्यकारी अभियंता श्री. ननावरे यांना आमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले.
याप्रश्नी सर्व वर्तमानपत्रांनी आवाज उठवून पाठपुरावा केल्याने हा प्रश्न तडीस लागण्यास मदत झाली असून, त्याबद्दल सर्वांचे मितेश पाटील, नंदन पाटील यांनी आभार मानले.
सर्व्हेक्षणासाठी महिलांचे ठाण
गेली नऊ वर्षे प्रलंबित प्रश्न सुटण्याचे पहिले पाउल उचलल्याचे समाधान महिला वर्गाच्या चेहर्यावर दिसत होते. तब्बल 2 तास 50 हून अधिक महिला या पोहोच रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी रस्त्यावर ठाण मांडून बसल्या होत्या. सर्व पक्षीय कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य देखील उपस्थित होते.