सुदर्शन राव
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका आगामी सहा महिन्यांमध्ये होणार आहे. दक्षिण दिग्विजयासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या कर्नाटकची निवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी महत्वाची आहे. काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा, भाजपची जनसंकल्प यात्रा, विविध विकासकामांची उद्घाटनं, संभाव्य नेतृत्वबदल यातून कर्नाटकमध्ये निवडणुकीचे वारे किती जोरात वाहत आहेत, हे सध्या लक्षात येत आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली. या यात्रेला कर्नाटकमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. काँग्रेसचे नेते गटबाजी, मतभेद विसरून एकत्र आले. काँग्रेसने विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसला आता फक्त कर्नाटकचीच सत्ता मिळण्याची अपेक्षा आहे. त्यात आता ‘आम आदमी पक्षा’नेही विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातल्या सर्व म्हणजेच 224 मतदारसंघांमधून, उत्तर आणि दक्षिण भागातून रथयात्रा काढण्याची योजना आखली आहे. सध्याची ‘जनसंकल्प यात्रा’ पूर्ण झाल्यानंतर लगेचच ही यात्रा सुरू करण्यात येणार आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसही राज्यभर बसप्रवासाचं नियोजन करत आहे. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील दोन स्वतंत्र टीम कर्नाटक पिंजून काढणार आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, जनसंकल्प यात्रेदरम्यान सामान्य लोकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी आणि तळागाळापर्यंत पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी विधानसभा मतदारसंघांना भेटी देत आहोत; या भेटींना मोठ्या प्रमाणात पाठिंबा आणि प्रतिसाद मिळत आहे, असं म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, आज राज्यात भाजपच्या बाजूने लाट दिसत आहे. सामान्य जनतेच्या पाठिंब्याने आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा विश्वास निर्माण झाला आहे. या यात्रेनंतर आम्ही उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही दिशांनी रथयात्रेला सुरुवात करून सर्व 224 विधानसभा मतदारसंघांमध्ये जाणार आहोत.
मुख्यमंत्री बोम्मई आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि संसदीय मंडळाचे सदस्य बी. एस येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या राज्य युनिटची ‘जन संकल्प यात्रा’ सुरू झाली आहे. तब्बल पाच महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. पक्षाची राज्य युनिट येत्या काही दिवसांमध्ये उडुपी, गदग, हावेरी आणि बेळगावी जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. भाजपने गेल्या महिन्यात रायचूर येथून जनसंकल्प यात्रा सुरू केली होती. नियोजित कार्यक्रमानुसार, दोन्ही पक्ष 25 डिसेंबरपूर्वी राज्यभरातल्या 52 विधानसभा मतदारसंघात फिरणार आहेत. यापैकी एका गटाचं नेतृत्व मुख्यमंत्री बोम्मई आणि येडियुरप्पा करत आहेत तर दुसर्या गटाचं नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील करत आहेत.
2023 मध्ये कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याआधी राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात निवडणुकीनंतर कर्नाटक मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. बोम्मई म्हणाले की, सध्या भाजपचं शीर्ष नेतृत्व हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत या निवडणुका संपताच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी बोलावण्यात येईल. यापूर्वी बोम्मई यांनी 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीला जाऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शीर्ष नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं होतं. पुढील वर्षी होणार्या राज्य निवडणुकांपूर्वी नवीन चेहर्यांना स्थान मिळावं यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा दबाव बोम्मई यांच्यावर आहे. गुजरातप्रमाणेच कर्नाटकमध्येही प्रयोग करून सर्वोच्च नेतृत्व संपूर्ण मंत्रिमंडळात फेरबदल करू शकतं.
आजघडीला भारतीय जनता पक्ष कर्नाटकमध्ये सत्तेत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या 150 जागांवर विजय मिळवण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठी बरीच धावपळ करत आहे. निवडणुकीतल्या संभाव्य समिकरणांचा माग काढत आहे. कमकुवत असलेल्या किंवा कधीही निवडणूक जिंकू न शकलेल्या जवळपास 60 मतदारसंघांमध्ये पक्षाने ठसा उमटवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. भाजपचे नेते या विधानसभा मतदारसंघांना भेटी देत आहेत. कार्यकर्त्यांवर विशेष जबाबदारी सोपवली जात आहे. नवीन चेहर्यांचा शोध घेतला जात आहे किंवा इतर पक्षांचे उमेदवार जोडले जात आहेत.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश तेनगिनकाई म्हणाले, आम्ही या जागांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करून काम करत आहोत. अशा जवळपास 60 जागा आहेत, जिथे भाजप कमकुवत आहे किंवा कधीही जिंकलेला नाही. असे बहुतेक मतदारसंघ म्हैसूर किंवा जुना म्हैसूर परिसरात आहेत. आम्ही आता या दिशेने काम करत आहोत आणि डिसेंबरपर्यंत यापैकी किती जागा जिंकता येतील याचा आकडा ध्येय म्हणून समोर ठेवत आहोत. म्हैसूर प्रदेशात दक्षिण कर्नाटकच्या 11 जिल्ह्यांमध्ये मोडणार्या 89 जागा आहेत.’’ दरम्यान, भाजपने राज्यात केलं तसंच धार्मिक राजकारण आता काँग्रेसनेही सुरु केलं असून आगीत तेल ओतायला सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या एका आमदाराने कर्नाटकमध्ये टिपू सुलतानचा शंभर फूट उंच पुतळा बसवण्याचं आश्वासन दिल्यानंतर, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकल्पाला संमती दिली आहे. त्याचबरोबर भाजप इतिहासातील तथ्यांचा विपर्यास करत खोटं बोलत असल्याचा आरोप केला.
कर्नाटकमधले काँग्रेस आमदार तन्वीर सैत यांनी म्हैसूरमधल्या श्रीरंगपटना इथे टिपू सुलतानचा शंभर फूट उंच पुतळा उभारण्याचं आश्वासन दिलं होतं. नरसिंहराजे मतदारसंघातून निवडून आलेले सैत म्हणाले की, हा पुतळा पुढील पिढ्यांसाठी टिपू सुलतानच्या खर्या इतिहासाचं प्रतीक म्हणून उभा राहील. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने त्या योद्ध्याचा इतिहास ‘विकृत’ केला असल्याचा दावा या आमदारांनी केला. म्हैसूरमधल्या टिपू कन्नड राज्योत्सवात भाग घेताना सैत म्हणाले की, टिपू सुलतानचा शंभर फूट उंच पुतळा म्हैसूर किंवा श्रीरंगपटना भागात स्थापित केला जाईल, जो त्याच्या वास्तविक इतिहासाचं प्रतीक म्हणूनसमोर राहील. भाजप सरकार टिपू सुलतानच्या इतिहासाचं विकृतीकरण करत असून त्याचा वारसा नष्ट करत आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. पक्षाने निवडणुकीसाठी तिकिट देण्याची प्रक्रिया जाहीर केली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीसाठी तिकीट मागणार्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पक्षाच्या सदस्यत्वाच्या माहितीसह दोन लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) सादर करावा लागणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले की, पक्षकार्य, इमारतींचं बांधकाम, निवडणूक प्रचार, जाहिरातींवर खर्च करण्यासाठी पैसे लागतात. काँग्रेसला इलेक्टोरल बाँड्स मिळत नाहीत, ते फक्त भाजपला मिळत आहेत. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांकडून निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक पक्षांचे नेते काँग्रेसमध्ये येऊ इच्छित असल्याचा दावा डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. काँग्रेस लवकरच यासाठी पुन्हा सदस्यत्व मोहीम सुरू करणार आहे. यामध्ये कोणीही अर्ज करू शकतो.
येत्या निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेसने राज्यात 224 पैकी 150 जागा जिंकण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. आता कर्नाटकमध्ये आम आदमी पक्ष (आप) विधानसभा निवडणुकीत सर्व 224 जागा लढवणार आहे. ‘आप’ने भ्रष्टाचार हा निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे. ‘आम आदमी पक्षा’ने बहुतांश मतदारसंघातून उभ्या राहणार्या उमेदवारांची यादी तयार केली आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि कर्नाटक ‘आप’चे निमंत्रक पृथ्वी रेड्डी यांनी सांगितलं की पक्षातर्फे सर्व जागा लढवल्या जातील. ग्रामसंपर्क अभियानाच्या माध्यमातून राज्यातल्या 170 मतदारसंघात ‘आप’चं अभियान सुरू करण्यात आलं आहे. परिसरात बूथस्तरावर लोकांची नियुक्ती केली जात आहे.
राज्यात सुमारे 58 हजार बूथ आहेत आणि पक्ष प्रत्येक बूथवर किमान 10 कार्यकर्त्यांची नियुक्ती करत आहे. बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांवर त्यांच्या भागातल्या लोकांच्या समस्या मांडण्याचं काम सोपवण्यात आलं आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यात आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात राज्यातले तीन मोठे पक्ष अपयशी ठरले आहेत. कर्नाटकमध्ये भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलासोबतच आता ‘आप’ही निवडणुकीच्या रिंगणात तरंग उमटवणार आहे, असं दिसतं.