सतीश कुंडाळे यांचे प्रतिपादन
। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील जनसंपर्क कार्यालयातील सभागृहात छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. सतीश कुंडाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वालनाने समारंभाची सुरुवात करण्यात आली.
भारतामध्ये विचारांचे दारिद्य्र आहे. बाई नाचवायची नसते तर वाचवायची असते, असे शिवरायांचे विचार आहेत. जर शिवरायांनी धर्म चळवळ राबविली नसती तर आपल्याकडील ब्राम्हण सुध्दा कोण झाले असते, हे सांगायला नको. शिवरायांचे धर्मा विरूध्द धर्म असे युद्ध नव्हते, तर अन्याया विरूध्द होते. आपण शिवनिती विसरलो म्हणून इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले. शिवरायांनी कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही. त्यांच्या राज्यात मुख्य पदावर अनेक मुस्लिम बांधव होते. ते सर्व धर्म समभाव मानत होते. आपण शिवरायांसारखे आहोत असे समजून वागले तरी अत्याचार होणार नाहीत, असे महत्वपूर्ण प्रतिपादन इतिहास अभ्यासक सतीश कुंडाळे यांनी येथे केले.
याप्रसंगी सुधाकर घारे, एकनाथ धुळे, शिवाजी खारीक, अॅड. रंजना धुळे, अॅड. स्वप्नील पालकर, बळीराम देशमुख, प्रकाश पालकर, अविनाश कडू, भानुदास पालकर जगदीश देशमुख, अशोक दिघे, रवींद्र घारे, केतन बेलोसे, प्रवीण देशमुख, सुचिता लोहकरे, अंकिता मोरे आदी उपस्थित होते.