रायगडात अलिबाग, म्हसळा, मुरुड, श्रीवर्धनमध्ये आढावा बैठका
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
मोदीवाद संपवून गांधीवाद आणण्यासाठी सर्वांनी एकजूट व ताकदीने संघटित व्हा, असे आवाहन काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा रायगड जिल्हा निरीक्षक राजेश शर्मा यांनी केले. यावेळी त्यांनी मोदींसह भाजप सरकारवरही हल्लाबोल केला.
एकेकाळी बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन, रायगड पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस ताकदीने सरसावलीय. श्रीवर्धनमध्ये काँग्रेसने घेतलेल्या आढावा बैठकीत राजेश शर्मा यांनी मोदींवर हल्लाबोल करीत आम्हाला मोदीवाद संपवून गांधीवाद जिवंत करायचा आहे, असा इशारा सरकारला दिला. रायगडात अलिबाग, म्हसळा, मुरुड, श्रीवर्धनमध्ये काँग्रेसच्या आढावा बैठका पार पडल्या. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा आणि रायगडचे काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांनी आपल्या भाषणाने कार्यकर्त्यांत उर्जितावस्था निर्माण केली. यावेळी शर्मा यांनी भाजपसह मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश बरबाद झाला आहे. शिवाय, आपला देश हा कर्जबाजारी होत चालला असून, याला सर्वस्व जबाबदार मोदी असून, आपला देश वाचविण्यासाठी काँग्रेसला संघटित करणे गरजेचे आहे. काँग्रेस स्ट्राँग झाली तर आपला देश वाचेल, असा टोलासुद्धा त्यांनी भाजपला लगावला.
आमची लढाई मोदी, अंबानी आणि अदानी यांच्याविरोधात ही असल्याचा घणाघात यावेळी त्यांनी केला. आमची लढाई ही आता केवळ देश वाचविण्यासाठी असून, मोदींना संपवण्यासाठीसुद्धा आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी मोदींवर केला. आपली लढाई ही गांधीवाद आणि मोदीवादची आहे. मला रायगडसाठी मोदीवाद संपविण्यासाठी पाठविले असून, आपल्या सर्वांना सोबत घेऊन हा मोदीवाद मी संपवणार, असा इशारासुद्धा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान पहलगाम हल्ल्ल्याबाबत युद्धजन्य परिस्थितीवर बोलताना सरकार जी भूमिका घेईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, मात्र याचवेळी त्यांनी असेही म्हटलं की सरकार जे जे बोलते त्या पद्धतीने काही होताना मात्र दिसत नाही, असे राजेश शर्मा म्हणाले.