केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटी; यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कोरोना साथीत मायबाप गमावलेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घेतली असून,अनाथ झालेल्या या बालकांच्या संगोपणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे.अलिबाग येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते या अनाथ बालकांच्या दस्तावेजाचे वितरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दि.30 मे 2022 पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत देशभरातील कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लाभ जारी करण्यात आले.
रायगड जिल्ह्यात पंचायत राज, केंद्रीय राज्यमंत्री श्री.कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते बालकांना लाभाचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी आ. प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अमित सानप, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अशोक पाटील, राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राचे श्र चिंतामणी मिश्रा व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातल्या 26 बालकांना लाभ आणि सेवा बाबतच्या किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील रायगड येथून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सहभागी झाले आणि रायगड परिसरात कोविड महामारीमुळे पालक गमावलेल्या 26 अनाथ मुलांना त्यांनी मुलांसाठीच्या पीएम केअर्स लाभार्थी किट्सचे वाटप केले. यामध्ये 18 वर्षावरील 6 तर 18 वर्षाखालील 20 अनाथ बालकांचा समावेश आहे.
या बालकांच्या भविष्याची चिंता मिटविण्यासाठी भारत सरकारबरोबरच महाराष्ट्र सरकारनेही योगदान दिले आहे. प्रधानमंत्री केअरमध्ये देशाच्या अनेक लोकांनी त्यांचा निधी दिलेला आहे, याचा अर्थ असा की, या देशातल्या 130 कोटी जनतेने खर्या अर्थाने या सगळ्या अनाथ बालकांचे पालकत्व स्विकारले आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे. – कपिल पाटील, केंद्रीय राज्यमंत्री
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनीही यावेळी या अनाथ बालकांशी संवाद साधला. या बालकांना धीर देवून त्यांनी या बालकांना त्यांच्या पुढील आयुष्यात ज्या क्षेत्रात स्वत:चे करिअर घडवायचे आहे, त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची खात्री दिली. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करू इच्छिणार्या बालकांनी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या गरूडझेप स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या बालकांना केले.