| पाली/बेणसे | वार्ताहर |
तिमिरातुनी तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी, मात्र दिवाळीचा आनंद सर्वांनाच घेणे शक्य नसते. आदिवासी वाड्यापाड्यांवर तर दिवाळीचा फराळ व रोषणाई फारच दुर्मिळ. म्हणूनच पाली सुधागडसह जिल्ह्यातील आदिवासी वाड्यापाड्यांवर आनंद व रोषणाई पोहचविण्यासाठी आणि त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, संघटनांचे हात पुढे सरसावले आहेत.
गोरख पाटील मित्र परिवार मुंब्रा यांच्यावतीने सिद्धेश्वर खुर्द आदिवासीवाडी आणि रेळाचीवाडी येथील 60 कुटुंबांना दिवाळी सणानिमित्त विविध साहित्य भेट देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. या साहित्यामध्ये 60 ब्लँकेट, 30 नऊवारी साड्या, 40 सहावारी साड्या, प्रत्येकी टॉवेल, मिठाई बॉक्स यांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील 50 विद्यार्थ्यांना रजिस्टर, चित्रकला वह्या, कलर बॉक्स, पाटी-पेन्सिल अशा प्रकारच शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक गोरख पाटील, सचिन पाटील, आयुब शेख, मयूर सारंग, मयूर पाटील, शंकर विश्वकर्मा, इरफान भाई उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शिक्षक उल्हास केदारी यांनी प्रयत्न केले तसेच शिक्षक पांडुरंग पारधी यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक दंत व आभार भगवान साजेकर यांनी मानले.
पेण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा गंगेची वाडी आणि गंगेची वाडी वस्ती येथे शनिवारी दिवाळीनिमित्त आरोहा गिव्हिंग विंग्स असोसिएशन या संस्थेतर्फे अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली. आदिवासीवाड्यांवर दिनदुबळ्यांच्या जीवनात एकप्रकारे दिपावलीची पणती पेटवण्याचे काम मुंबईतील आरोहा ग्रुप यांनी यंदाही केले. प्रो.वर्गीस आणि डॉ. सुशील केत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विनित तांडेल, रोहित राणे, प्रसाद चव्हाण, अक्षय राणे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.