कडधान्यांसहित आंबा पिकाचे नुकसान
। कोलाड । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यात गेली चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे कडधान्य पिकांसहित आंबा, काजु व इतर फळझाडांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे शेतकर्यांवर आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गेली चार ते पाच दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वाल, मटकी, मुग, हरभरा, चवळी, तूर या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या दिवसांत पिकांना सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असतो. परंतु, ढगाळ वातावरणामुळे कडधान्य पिकांची पाने पिवळी पडत असुन त्या पानांमध्ये अळी तयार झाली असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आंबा, काजु, इतर फळझाडे यांचे पिक उत्तम प्रकारे यावे म्हणून बागायतीदारांनी महागडी औषधे यांची फवारणी केली आहे. तसेच, बागायतीची मशागत करुन हजारो रुपये खर्च केले आहेत. परंतु, निसर्गाच्या बदलामुळे सर्व मेहनतीवर पाणी फेरेल की काय? अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
खरीप हंगामात भात पिक उत्तम प्रकारे येऊनही अवकाळी पावसाने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेला. या परिस्थितीचा सामना करीत रब्बी हंगामात शेतीची मशागत करून विविध प्रकारच्या कडधान्याची लागवड केली. परंतु, चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कडधान्य पिक धोक्यात आले आहे. तसेच, आंबा, काजु व इतर फळझाडांचे मोहोर गळू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्गाला नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
चंद्रकांत लोखंडे,
शेतकरी