विमानतळ नामकरणाचा प्रश्न पेटणार

जासईतून ‌‘आरपार’ लढ्याची हाक; रश्मिता पोपेटा मैदानात, सरकारला थेट इशारा

| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवत सरकारने दाखवलेल्या उदासीनते विरोधात आता जनतेचा संताप उफाळून येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर जासई येथील तरुणी रश्मिता पोपेटा हिने आक्रमक भूमिका घेत थेट आंदोलनाचा बिगुल वाजवला आहे.

जासई ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत या लढ्याची ठोस रणनीती जाहीर करण्यात आली. दि.बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांची उपस्थिती आणि स्थानिक पातळीवरील वाढता पाठिंबा यामुळे या आंदोलनाला नवे बळ मिळाले आहे. सरपंच संतोष घरत यांनीही या बैठकीत महत्त्वाची भूमिका बजावत पाठिंबा दर्शविला. यावेळी ‌‘आता मागे हटणार नाही, ही आरपारची लढाई असेल’, असा इशारा देत रश्मिता पोपेटा हिने सरकारला थेट आव्हान दिले आहे. तसेच, विमानतळ नामकरणाची अधिकृत अधिसूचना जाहीर होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा तिचा ठाम पवित्रा आहे.

येत्या आठवड्यापासून गावोगावी ‌‘जननिर्धार यात्रा’ काढत जनतेचा कौल गोळा केला जाणार आहे. पंच कमिटींकडून लेखी पाठिंबा घेत आंदोलन अधिक व्यापक करण्याची तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, तरुणाईला या लढ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. जून महिन्यात चिंचपाडा पुलाशेजारी उपोषणाला सुरुवात होणार असून, गरज पडल्यास मुंबईकडे जाणारे महामार्ग रोखण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकारवर मोठा दबाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या आंदोलनामुळे आतापर्यंत शांत बसलेल्या लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठू लागली असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सामान्य नागरिकांमधून या लढ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

Exit mobile version