भारताचा चीनला इशारा!
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गलवान प्रांतात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्यात अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात चीनकडून सातत्याने अतिक्रमण केलं जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. चीनबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांनी वारंवार टीका केल्यानं एकीकडे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सीमाभागात चीनकडून आता हालचाली वाढवण्यात आल्यामुळे सामरिक दृष्ट्या देखील या मुद्द्यावरून तणाव निर्माण होऊ लागला आहे. मात्र, भारतीय लष्कर कोणत्याही प्रकारच्या कारवाईसाठी सज्ज असल्याचा ठाम निर्धार इस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सीमाभागात चीनी लष्कराच्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयार असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाभागात चीनच्या बाजूला चीनी सैन्यानं गस्तीचं प्रमाण वाढवलं आहे. त्याशिवाय, सैन्याच्या विविध तुकड्यांचा एकत्रित सराव देखील सीमाभागात वाढला आहे. त्यामुळे चीनकडून पुन्हा एकद आगळीक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडून देखील आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आल्याचं पांडे यांनी सांगितलं.