शेकाप नेते पंडित पाटील यांचा घणाघात
श्रीवर्धन | वार्ताहर |
कोकणातील मुलभूत विकासकामे पूर्ण करुन घेण्यात येथील लोकप्रतिनिधी कमी पडत असून,त्यांचा सरकारवर दबाव राहिलेला नाही,अशी टीका शेकाप नेते माजी आम.पंडित पाटील यांनी केला आहे.
श्रीवर्धन तहसीलदार कार्यालयात सोमवारी पेट्रोल, गॅस सिलेंडर आदीं जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी तहसीलदार यांचेकडे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलं यावेळी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडेच काढले. मुंबईतून नागपूरला जाणारे दहा रस्ते आहेत. मात्र कोकणात जाणार एकच रस्ता आहे तो पण लवकर होत नाही त्यामुळे इथल्या लोकप्रतिनिधींचा राज्य सरकारवर दबाव नाही असे वक्तव्य माजी आमदार पंडित पाटील यांनी केलं.
समुद्राच्या खार्या पाण्याने रायगडातील हजारो एकर जमीन नापिक बनली आहे.पण सरकारचे खारलॅन्डच्या खात्यालाच लकवा मारल्यासारखे झाल्याची टीकाही त्यांनी केली. तहसीलदार यांनी रोजगार हमीतून खारलाईनची काम करून समुद्राच्या पाण्याखाली जाणारी शेती वाचवावी अशी आग्रही मागणी यावेळी पाटील यांनी केली.
श्रीवर्धन हा माजी मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांचा बालेकिल्ला. या मतदार संघातून अनेक मंत्री झाले. आता केवळ विकासाचे पत्र दाखवून नारळ फोडण्याचे प्रकार वाढल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
श्रीवर्धन तालुक्यात कोपर्यात आज उपजिल्हा रुग्णालयात आहे मात्र आयसीयु आणि डायलेसिस सुविधा उपलब्ध नाही ती प्राप्त व्हावी यासाठी आम.जयंत पाटील यांच्या माध्यमातून शेकापतर्फे आरोग्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा केला जाईल.
पंडित पाटील,माजी आमदार
चक्रीवादळात नुकसानभरपाई मिळाली मात्र जनतेत समाधान नसल्याचं देखील पाटील यांनी सांगितलं कोरोना काळात लोकांचा व्यवसाय बुडाला आहे लोकांना जेवणाचे हाल होत आहेत. महागाईच्या विरोधात हल्लाबोल करून भाजपने सत्ता मिळवली आणि आता दिवसेंदिवस पेट्रोल डिझल गॅस सिलेंडर व इतर जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत त्यांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी असलेलं पत्र यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसीलदार श्रीवर्धन यांचेकडे सुपूर्द करण्यात आलं यावेळी श्रीवर्धन तालुका चिटणीस वसंत यादव आदी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.