पावसाची चाहूल लागताच धरली घरची वाट
| पाताळगंगा | वार्ताहर |
गेले आठ महिने खडतर प्रवास करीत असताना पावसाची चाहूल लागली की प्रत्येक मेंढपाळ आपल्या मायभूमीकडे प्रस्थान करीत असतात. कारण, घाटमाथ्यावर चार महिने या मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होत असतो. परंतु, पाऊस शांत झाला की पुन्हा एकदा हा धनगर समाज आपल्याजवळील असलेला लावाजवा घेऊन कोकणात येत असतात.
साधारण दिवाळी सणामध्ये या मेंढपाळांचे कोकणात आगमन होत असते. पावसाळ्यात विविध प्रकारची काटेरी वनस्पती निर्माण होत असते. यामुळे त्यांच्या चार्यांचा प्रश्न मार्गी लागत असतो. कोकणात आल्यानंतर मेंढपाळांचा प्रपंच आज इथे तर उद्या तिथे ऑक्टोबर ते मे-जूनदरम्यान उघड्यावरच असतो. सुमारे 250 ते 300 किलोमीटर मेंढपाळांना चार्यासाठी भटकंती करावी लागते.
दरम्यान, पाऊस पडू लागल्याचे चिन्ह निर्माण होत असल्यामुळे मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन आपल्या घरी परतीची वाट धरू लागले आहेत. पाऊस उशिरा पडला किंवा पावसाने दडी मारली तर मेंढपाळांचा मुक्काम वाढत असतो.