हरित लवाद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर; स्थानिक प्रशासनाची संशयास्पद भूमिका
| रेवदंडा | निलेश फुंडे |
मुरुड तालुक्यातील ताराबंदर (कोलमांडला) येथे पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील कांदळवन परिसरात पुन्हा बेकायदेशीर माती भराव सुरू झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हरित लवाद आणि जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतानाही उघडपणे नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ताराबंदर येथील कांदळवन क्षेत्रात 12 एप्रिल रोजी सायंकाळी पुन्हा एकदा अनधिकृत माती भरावाचे काम सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वी कोट्यवधी रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, वन विभागाकडून गुन्हाही दाखल झाला होता. तरी ही पोकलेन व जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने भराव टाकण्याचे काम पुन्हा सुरू झाल्याने प्रशासनाची निष्क्रियता उघड झाली आहे. प्रशासनाकडून होत असलेल्या बघ्याच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे.
घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतल्यावर कंत्राटदार व कामगारांनी अरेरावीची भाषा वापरत “वन विभागाची परवानगी आहे” असा दावा केला. मात्र, ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतल्यावर संबंधितांनी यंत्रसामग्री लपवून पळ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ पुरावे ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले असतानाही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, त्यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
प्रशासनाची टाळाटाळ
वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन ढगे तसेच मुरुड तहसीलदार आदेश डफळ यांना वारंवार माहिती देऊनही त्यांनी जबाबदारी झटकत “वन विभागाशी संपर्क साधा” अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. फोटो व व्हिडिओ दाखवूनही अधिकाऱ्यांची उदासीनता कायम राहिल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
अन्यथा न्यायालयात जाणार
हरित लवाद व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उघडपणे उल्लंघन होत असताना संबंधित अधिकाऱ्यांचे मौन संशयास्पद ठरत आहे. बेकायदेशीर भराव कोणाच्या संरक्षणाखाली सुरू आहे? प्रशासन आणि कंत्राटदारांमध्ये संगनमत आहे का? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ताराबंदर ग्रामस्थ मंडळाने या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला असून, या प्रकारामुळे किनारी परिसंस्थेला मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
व्हिडिओ, फोटो पुरावे देऊनही प्रशासन कारवाई करत नाही. आदेश असतानाही काम सुरू आहे, याचा अर्थ कुणाचे तरी संरक्षण आहे. आता आम्ही न्यायालयात जाऊन लढा देणार.
ग्रामस्थ मंडळ,
ताराबंदर
कांदळवन नष्ट करणे म्हणजे पर्यावरणाशी खेळ आहे. प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
स्थानिक नागरिक
