पोलादपूर नगरपंचायतीला राष्ट्रीय हरित लवादाची नोटीस
| पोलादपूर | प्रतिनिधी |
सावित्री नदीपात्रात अनधिकृतपणे घनकचरा टाकल्याप्रकरणी पोलादपूर नगरपंचायतीला राष्ट्रीय हरित लवादाकडून पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील ‘सत्कार ग्रामीण फाऊंडेशन’ या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवरून हरित लवादाने ही गंभीर दखल घेतली असून, पोलादपूर नगरपंचायत, तहसील कार्यालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
विशेष म्हणजे, यापूर्वीही 2021 मध्ये पोलादपूर स्मशानभूमीलगत साठवलेला कचरा पूरकाळात सावित्री नदीत सोडल्याप्रकरणी नगरपंचायतीवर तब्बल सात लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तरीदेखील प्रशासनाने धडा न घेतल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.
सत्कार ग्रामीण फाउंडेशनच्या तक्रारीनुसार, पोलादपूर शहरातील घनकचरा कोणतीही प्रक्रिया न करता थेट सावित्री नदीपात्रात टाकला जात आहे. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून, पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. संस्थेने छायाचित्रे, स्थानिकांच्या तक्रारी आणि संबंधित कागदपत्रांसह राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती.
सावित्री नदीलगत अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत नदीपात्रात कचरा टाकल्याने नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ येत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी स्मशानभूमीलगतचा कचरा पूरकाळात नदीत वाहून गेल्याने नगरपंचायतीवर दंडात्मक कारवाई झाली होती. मात्र, आता सावित्री आणि चोळई नदीच्या संगमावरील दगडगोट्यांवर पुन्हा शहरातील कचरा टाकण्याचा प्रकार सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात ‘आमची माती आमची माणसं’ या सामाजिक संघटनेने सावित्री-चोळई संगमावरील घनकचऱ्याविरोधात दोन वेळा आंदोलन केले होते. आता राष्ट्रीय हरित लवादाच्या नोटीसीनंतर नगरपंचायत प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे पोलादपूरकरांचे लक्ष लागले आहे. घरपट्टीवाढीच्या संकटात नागरिकांना ढकलून, त्याच नागरिकांच्या पैशातून हरित लवादाचे दंड भरावे लागत असल्याने नगरपंचायत प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.







