अद्याप मुरूड मार्केटला मासळीचा ठणठणाट
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
गेले आठ दिवस अरबी समुद्रात वादळी वार्यासह आलेल्या वादळाची तीव्रता क्षीण झाल्याने समुद्र सध्या शांत झालेला दिसून येत आहे. त्यामुळे आगरदांडा-दिघी बंदरात आश्रयाला आलेल्या सर्व नौका शनिवारी रात्री खोल समुद्रातील मासेमारीस रवाना झाल्याची माहिती मुरूड तालुका मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर आणि एकदरा येथील माहेश्वरी मच्छिमार सोसायटीचे व्हाईस चेअरमन ध्रुव गोपाळ लोदी यांनी रविवारी दिली. सध्या पाऊस पडतोय; परंतु तरीही वादळी वातावरण नसल्याने मच्छिमारांनी हा निर्णय घेतला आहे.
गेले आठवडाभर तीव्र वादळी स्थिती असल्याने स्थानिक आणि परगावच्या असंख्य शेकडो मासेमारी नौका आगरदांडा-दिघी बंदरात आश्रयाला आल्या होत्या. स्थानिक दालदी जाळी असणारे मच्छिमारदेखील रविवारी मासेमारीस गेल्याने मुरूड मार्केटमध्येदेखील मासळीचा ठणठणाट होता. मुंबईकडील लाल रंग लावलेले बोंबील सकाळी दिसून येत होते. विकायलादेखील मासळी नाही अशी परिस्थिती होती.
सुरमई, रावस, पापलेट, कुपा, घोळ अशी मोठी मासळी दिसून येत नव्हती. राजपुरी तेथील ज्येष्ठ मच्छिमार धनंजय गिदी म्हणाले की, एक होडीचे दोन लाख रुपये नुकसान पकडले तरी किमान 700 नौका आहेत. मासेमारी गेले आठवडाभर ठप्प झाल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी आगरदांडा-दिघी बंदर खाडीत नौका नसल्याने जंजिरा जलदुर्गापासून आगरदांडा-दिघी खाडीत शुकशुकाट आणि सन्नाटा दिसून येत होता. या परिस्थितीवर बोलताना काही मच्छिमारांनी सांगितले की, वातावरण निवळल्याने नौका मासेमारीस गेल्या असल्या तरी वादळी वारे आणि पावसाचा कोणताही भरवसा नाही, असे स्पष्ट केले आहे.
चौकट..
मासेमारी बेभरवशाची
गेल्या काही वर्षात समुद्रातील मासेमारी बेभरवशाची बनली आहे. 25-30 वर्षांपूर्वी परिसरात मुबलक सर्व प्रकारची मासळी मिळत होती. आता काटेरी मासळीदेखील प्रचंड महागली आहे. पारंपरिक मच्छिमारांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनिक बनली आहे. समुद्रात जाऊन मासळी मिळेल की नाही याची मच्छिमारांनादेखील शाश्वती राहिलेली नाही. सतत येणारी वादळे हा प्रकारच गेल्या पाच-सहा वर्षात मासेमारी नेस्तनाबूत करणारा ठरला आहे.लाखो मच्छिमार कुटुंब मासेमारीवर अवलंबून आहेत. त्यामुळे भविष्यात काय होणार? हाच प्रश्न ऐरणीवर आला आहे.