। मुंबई । वार्ताहर ।
खासगी रुग्णालयातील अनेक आरोग्य कर्मचार्यांकडून तिसर्या मात्रेची मागणी केली जात आहे. मात्र असे असले तरी तिसरी मात्रा देणे कितपत आवश्यक आणि सुरक्षित आहे याचा संशोधनात्मक अभ्यास जगभरात कुठेच प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे याबाबत शिफारस करणे सध्या योग्य नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जानेवारीत लसीकरण सुरू झाले तेव्हा सुरुवातीला आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण प्राधान्याने केले गेले. त्यामुळे या कर्मचार्यांचे लसीकरण होऊन आता जवळपास सात ते आठ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. आता संभाव्य तिसर्या लाटेमध्ये पुन्हा कोरोना संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी खासगी रुग्णालयातील कर्मचार्यांकडून तिसरी मात्रा देण्याची मागणी केली जात आहे. इंडियन मेडिकल ऑफ असोसिएशनेदेखील केंद्रीय आरोग्य विभागाकडे आरोग्य कर्मचार्यांना तिसरी मात्रा देण्याची मागणी केली होती. अनेक नागरिकांना लशीची एक मात्राही मिळालेली नाही, तेव्हा तिसरी मात्रा देण्याचा विचार सध्या केला जाणार नाही, असे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले.