रस्त्याचे काम झाले नाही तर आंदोलनाचा इशारा
। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या दहिवली गावातील ग्रामस्थांनी रस्त्याला पडलेले खड्डे श्रमदानातून बुजविले. शहरापासून दहा किलोमीटर दुरीवर उथळ आणि कातळ भागावर वसलेला दहीवली गाव हा तालुक्याचा शेवटचा टोक म्हणून ओळखला जातो. या गावातील ग्रामस्थांनी ऊसरमार्गे दहिवली ते चरई या रस्त्यावरील खड्डे परिश्रम घेऊन बुजविले. या रस्त्याच्या ठेकेदाराने रस्ता जेवढ्या रुंदीचा पाहिजे तेवढा रुंदीचा बनविला नाही. सदर गोष्टीची ठेकेदारास काम करताना दहिवली ग्रामस्थांनी सूचना करून दिली होती. परंतु ठेकेदाराने आमच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले तसेच संबंधित ठेकेदाराकडून ह्या रस्त्याचे काम हे नित्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळे परिणामी पावसाळ्यात ह्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्डयांचा आकार एवढा मोठा होता की रस्त्यावर खड्डे पडले आहेत की खड्डयात रस्ता आहे हे कळत नव्हते. ह्या रस्त्यावरून सध्या एसटीची वाहतूक सुरू असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्डयांमुळे एसटी चालक हैराण झाले होते व सदर रस्त्याची डागडुजी झाली नाही तर एसटी सेवा बंद करण्यात येईल असे दहिवली ग्रामस्थांना सांगण्यात आले होते. असे झाले तर गावातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी मोठी अडचण निर्माण झाली असती. सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित अधिकारी व बांधकाम विभागाला ग्रामस्थांनी पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेट घेऊन कळविले होते. परंतु संबंधितांकडून कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांनी एसटी सेवा सुरू रहावी तसेच गावातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी व त्यांना शाळा,कॉलेजमध्ये वेळेवर जाता यावे यासाठी श्रमदानातून सदर रस्त्याला पडलेले मोठमोठे खड्डे बुजविण्याचे काम केले.
रस्त्याचे रुंदीकरण व उत्कृष्ट दर्जाचे काम लवकरात लवकर झाले नाही तर आमच्या मुला बाळांना शाळा व कॉलेजमध्ये जाणे बंद करावे लागेल. रिक्षावाल्यांचे जास्तीचे पैसे आमच्या सारख्या गरिबांना परवडणारे नाही त्यामुळे संबंधित विभागाने सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अन्यथा सदर रस्त्यासाठी ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येईल.
मोहन दिवेकर, ग्रामस्थ दहिवली