। महाड । प्रतिनिधी ।
ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचे साक्षीदार असलेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत निकटचे सहकारी कै.सुरबानाना टिपणीस यांच्या घराची भिंत अतिवृष्टीत कोसळली. या घराची दुरुस्ती केली जावी व सुरबानाना टिपणीस यांचे नावाने भव्य स्मारक उभे केले जावे, अशी मागणी महाडकर नागरिक करत आहेत. या घराच्या दुरवस्थेमुळे शहरातील एक ऐतिहासिक ठेवा काळाच्या पडद्याआड जात असल्याचे चित्र समोर येवू लागले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सामाजिक क्रांती करून संपूर्ण देशातील दलित, शोषितांना पिण्याच्या पाण्याचा न्याय मिळवून दिला. ही घटना जागतिक पटलावर सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली. या संपूर्ण सामाजिक क्रांतीचा विचार आणि पूर्वतयारीच्या बैठका महाडमधील सुरबानाना टिपणीस यांच्या निवासस्थानातच झाल्या. मनुस्मृती दहन दिन आणि चवदारतळे सामाजिक क्रांती करिता महाड मध्ये ज्या ज्या वेळी डॉ.आंबेडकर यांनी भेट दिली त्या त्या वेळी त्यांनी या वास्तूत येऊन थांबले. याच ठिकाणी चवदारतळे सत्याग्रहाचा विचार संपूर्ण महाराष्ट्रात गेला.
डॉ.आंबेडकर यांनी याठिकाणी वास्तव्य केले असल्याने या पावन इमारतीला अनन्यसाधारण महत्व आहे. सुरबानाना टिपणीस यांनी डॉ. आंबेडकर यांच्या या सामाजिक क्रांती मध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या सामाजिक क्रांतीत महाडमधील सुरबानाना टिपणीस यांनी उडी घेवून मोलाचे सहकार्य केले आहे. यामुळे देशभरातील लाखो भीमसैनिक चवदारतळे सामाजिक क्रांतीच्या स्मृतिदिनाला महाड मध्ये आल्यानंतर याठिकाणी भेट देतात. 20 मार्च रोजी चवदारतळे क्रांतीच्या स्मृतीदिनी समता सैनिक दल या वास्तूसमोर अभिवादन करण्यास दाखल होतात.
वास्तुला अनेक धक्के
तमाम आंबेडकरी जनतेच्या हृदयस्थानी असलेली ही वास्तू दुर्लक्षित राहिल्याने काळाच्या ओघात हि वास्तू जीर्ण होत गेली आहे. गेल्या अनेक वर्षात या वास्तूने अनेक पूर, आणि इतर धक्के सहन केले आहेत. दोन वर्षापूर्वी याच वास्तूला आगीने देखील घेरले होते. तर गतवर्षी शेजारील आंब्याच्या वृक्षाची फांदी पडून मोठे नुकसान झाले होते. आज गेली दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसात घराची एक बाजूची भिंत पूर्णपणे कोसळली आहे. यामुळे महामानव डॉ. आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली वास्तू काळाच्या ओघात पडद्याआड जात आहे. या वास्तूला शासनाने टिपणीसांच्या वारसांना बरोबर घेवून सुरबानाना टिपणीस यांच्या स्मारकाचा दर्जा देवून त्याची पुनर्उभारणी केली जावी अशी मागणी महाडकर नागरिक करत आहेत.
डॉ.आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुरबानाना टिपणीस यांचे निवास्थानाची एक भिंत कोसळली. यामुळे एक ऐतिहासिक वारसा काळाच्या ओघात पडद्याआड जावू लागला आहे. यामुळे शासनाने या वास्तूची बांधणी करून सुरबानाना टिपणीस यांच्या घराला स्मारकाचा दर्जा द्यावा.
– अनंत कांबळे, चवदारतळे सामाजिक समरसता विचार मंच