| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा 520 किमीचा टप्पा 11 डिसेंबरपासून वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मात्र या मार्गातील पॅकेज 5 मधील नागपूर ते मुंबई दिशेने जाणार्या 10 ते 12 किमीच्या रस्त्याचे काम अपूर्ण असून ते पूर्ण होण्यासाठी लोकार्पणानंतर 15 दिवसाचा कालावधी लागणार आहे. असे असले प्रवाशांना कुठेही वळसा घालावा लागणार नसून समृद्धीवरूनच थेट प्रवास करता येणार आहे. नागपूर ते मुंबईच्या दिशेने जाणारी बाजू तयार असून या बाजूने दुतर्फा वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग 701 किमीचा असून यातील 520 किमीच्या नागपूर ते शिर्डी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. लोकार्पणानंतर नागपूर ते शिर्डी वाहतूक यावरून सुरू होणार आहे. मात्र या टप्प्यातील नागपूर ते मुंबईच्या दिशेच्या मार्गिकेतील वाशीम येथील 10 ते 12 किमीच्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे यादरम्यान मुंबई ते नागपूरच्या दिशेने दुतर्फा वाहतूक सोडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील (एमएसआरडीसी) वरिष्ठ अधिकार्याने दिली.
नागपूर ते शिर्डी टप्प्यात 42.8 किमीचा सेलू बाजार, वाशीम ते सिंदखेड राजा, बुलढाणा असा टप्पा-5 आहे. या टप्प्यातील नागपूर ते मुंबई दिशेने जाणार्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. मात्र मुंबई ते नागपूर दिशेने जाणार्या मार्गिकेतील 10 ते 12 किमीच्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. यातील दोन पुलांचे काम लोकार्पणापर्यंत होणे शक्य नाही. त्यामुळे एमएसआरडीसीने यादरम्यान तयार मार्गिकेवरून दोन्ही दिशेची वाहतूक सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काम अपूर्ण असले तरी प्रवाशांना थेट प्रवास करता येणार असल्याची माहिती या अधिकार्यांनी दिली. 10 डिसेंबरला 10 ते 12 किमीदरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण होणार आहे. पण त्यानंतर उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी तसेच हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी किमान 15 दिवस लागणार आहेत. तेव्हा समृद्धीचा थेट 520 किमीचा टप्पा डिसेंबरअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.