गीता पालरेचा यांचा चर्चेला पूर्णविराम
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गीता पालरेचा ह्या भाजपमध्ये होत असलेल्या घुसमटीमुळे पुन्हा राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून वृत्त माध्यमातून व जनमानसात सुरू होती. ही चर्चा जोरात रंगली असतानाच गीता पालरेचा यांनी दि. 8 ऑगस्ट रोजी पाली येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत या चर्चेला पूर्णविराम दिला असून, आम्ही भारतीय जनता पार्टीतच राहणार असल्याचे सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, भाजप हा फार मोठा पक्ष आहे. लोकहितासाठी मी व माझे कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, स्थानिक पुढार्यांच्या होत असलेल्या राजकारणाचा सामान्य कार्यकर्त्यांना त्रास होत आहे. पक्षाच्या नियोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना निमंत्रण देणे टाळणे, निधी वाटपात कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे, अशा विविध प्रकारच्या कुरघोडी स्थानिक पुढारी करत आहेत. अशा तक्रारी कार्यकर्त्यांनी माझ्याकडे केलेल्या आहेत. या तक्रारीबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार आहे. कार्यकर्ते नाराज आहेत, मात्र कोणी कुठेही प्रवेश करणार नाहीत. आम्ही भाजपमध्येच राहणार असल्याचे गीता पालरेचा यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.