| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भाताण बोगद्याच्या अगोदर सहा जणांच्या अज्ञात टोळीने एका व्यक्तीस लाखो रुपयाला लुटल्याची घटना घडली होती. या प्रकारानंतर गाडी तेथेच सोडून ती टोळी पसार झाली. या बाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त सहाय्याने या आरोपींना अवघ्या 24 तासात अटक केली आहे. त्यांच्याकडून गाडीसोबत एकूण 8 लाख 17 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आजिनाथ राख (वय 37) हे पहाटेच्या सुमारास गाडीतून ठाणे बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना पनवेलजवळील भाताण बोगद्याजवळ त्यांच्यामागे आलेल्या एर्टिगा गाडीतील अनोळखी सहा इसमांनी त्यांच्या गाडीला ठोकर मारल्याचा बहाणा त्यांची गाडी जबरदस्तीने थांबवली. त्यानंतर आजिनाथ यांना मारहाण करून खालापूर फूड मॉल येथे जबरदस्तीने घेऊन जाऊन त्यांच्या गाडीत असलेली एक लाख 97 हजार रुपये व ओपो कंपनीचा मोबाईल फोन व इतर ऐवज असा मिळून जवळपास दोन लाख 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरला. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.
पथकाने प्रवासादरम्यानचे सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले. फिर्यादीच्या वाहनाच्या पुढे मागे जाणार्य सर्व सफेद रंगाच्या ईर्टिका गाडीचे रजि. क्रमांक प्राप्त केले व वेळेचे अचूक गणित जुळवून तसेच टोल नाक्यावरून फास्टटॅग स्कॅनच्या मदतीने नमुद मोटार कारचा रजि. प्राप्त केला. त्यावरून फास्टटॅग धारकाचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला. तपासादरम्यान ही कार पुन्हा खालापूर टोल नाक्यावरून मुंबईकडे पास झाल्याची माहिती मिळाली. यावेळी वाहन मालकास त्वरित ताब्यात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणावरून आरोपी राजू आप्पा पुकळे ( रा. कळंंबोली), प्रमोद कोकरे ( कोपरखैराणे), मायाप्पा वळकुंदे ( कळंबोली), किरण सरगर कामोठे), अशोक पाटील कळंबोली), संदीप कोकरे ( कुर्ला) यांना ताब्यात घेतले.