मुरुड | वार्ताहर |
मुरुड समुद्रकिनारी पावसाळ्यामध्ये अधूनमधून येणार्या वादळसदृश्य परिस्थितीमुळे व समुद्रातील भरतीच्या वेळी किनार्यावर प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात वाहून येत असल्याने किनारी कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणावर होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील समुद्रकिनारपट्टीवर प्लास्टिक प्रदूषणाची गंभीर समस्या जाणवत आहे. या प्लास्टिकमध्ये कार्बन, इथेनॉल ऑक्साईड, झायलीन, बेन्झील इत्यादी रासायनिक विषारी घटक असतात. या प्लास्टिकचे छोटे तुकडे मासे गिळतात. ते माशांच्या आरोग्यास हानिकारक असतात. या माशांच्या सेवनाने मनुष्याच्याही आरोग्यास धोका संभवतो, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
मासेमारी करताना जाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक सापडते, त्यामुळे मच्छिमारांचे फार मोठे नुकसान होत असल्याचे एसटीएमएम मच्छिमार संघाचे समन्वयक प्रकाश सरपाटील यांनी सांगितले. यावर उपाय म्हणून केरळ सरकारने ज्याप्रमाणे ‘शुचित्व सागरम’ ही योजना राबवली आहे, त्याचे अनुकरण इतर राज्यांनी केल्यास समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील किनारपट्टीवर स्थानिक स्वराज्य संस्था, काही सेवाभावी संस्था, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यामार्फत हा कचरा उचलला जातो; परंतु पानमसाल्यासारखी छोटी पाकिटे, छोटे प्लास्टिकचे तुकडे उचलले जात नाहीत. प्लास्टिकचे छोटे तुकडे शोधून काढण्याची यंत्रणा कार्यान्वित करावी, तसेच सरकारने नागरिकांच्या सवसह बदलण्यासाठी जनजागृतीसाठी उपाययोजना करून प्लास्टिक प्रदूषणावर मात करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.