महापौर पेडणेकर यांचे साध्वी गिरी यांना खडे बोल
। मुंबई । वृत्तसंस्था ।
धार्मिक क्षेत्रात काम करणार्यांनी राजकारण करू नये, शिवसेनाप्रमुखांच्या मुलाबाबत कोणीही महाराष्ट्रात येऊन काही म्हणणार असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर यांनी साध्वी कांचन गिरी यांना खडे बोल सुनावले आहेत.
नुकताच कांचन गिरी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांना अयोध्या येथे येण्याचे निमंत्रण केले. राज ठाकरे यांनीही अयोध्येला येणार असल्याचे आश्वासन दिले. या भेटीनंतर कांचन गिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्या टीकेला महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.
हिंदुत्व आणि धर्माचा प्रत्येकाला अभिमान आहे. घरात धर्म पाळा आणि घराबाहेर आल्यानंतर राष्ट्रीयत्वाचे पालन करणे म्हणजेच हिंदुत्व आहे, हिंदुत्व हे मिरवण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. त्याला सोयीनुसार वापरू नका, अशी सूचना देत बाळासाहेबांच्या पुत्राने रामजन्मभूमी येथे जाऊन ज्या पद्धतीने काम केले तेव्हा कांचन गिरी कुठे होत्या? यांना कोणालाही प्रमाणपत्र देण्याचा अधिकार काय, असा प्रश्नही महापौरांनी उपस्थित केला.