शेकापचे दोन हजारांहून अधिक कार्यकर्ते होणार सामील
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मतदार याद्यांच्या घोळाविरोधात महाविकास आघाडीसह शेतकरी कामगार पक्ष, मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत चर्चगेट ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून, कार्यकर्ते मोर्चात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. रायगड जिल्ह्यातून शेतकरी कामगार पक्षाचे दोन हजारांहून अधिक कार्यकर्ते या मोर्चात सामील होणार असल्याचा विश्वास जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी व्यक्त केला.
राज्यातील मतदार यांद्याच्या घोळाबाबत मागील काही दिवसांपूर्वी शेकापसह महाविकास आघाडी व मनसेच्या प्रमुख मंडळींनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. सदोष मतदार याद्या दुरुस्त करून त्या अद्ययावत करा, अशी मागणी त्यावेळी केली होती. परंतु, त्याची कार्यवाही अद्याप झाली नसल्याने महाविकास आघाडी, मनसेच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. सदोष मतदार याद्या दुरुस्त करून अद्ययावत केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, या मागणीसाठी उद्या शनिवारी (दि.1) महाविकास आघाडी-मनसेच्यावतीने विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. मुंबईतील फॅशन स्ट्रीट चर्चगेट ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे.
महाराष्ट्रातील डावे पक्ष हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असून, या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी राहण्याचा निर्णय डाव्या पक्षांनी घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या चिटणीस मंडळासह तालुका चिटणीस मंडळाची वेळोवेळी बैठक घेण्यात आली. या बैठकीतून मुंबईतील मोर्चात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातून शेतकरी कामगार पक्षाचे दोन हजारांहून अधिक कार्यकर्ते मुंबईत दाखल होतील, असा विश्वास शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी व्यक्त केला आहे.





