सुट्टी संपल्याने पर्यटक परतीच्या मार्गावर

| दिघी | वार्ताहर |

आठवडाभर सुटी घालवण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी श्रीवर्धन तालुका हाऊस फुल झाला होता. तालुक्यातील प्रसिद्ध दिवेआगर पर्यटन स्थळी यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दीची नोंद झाली आहे. सुरक्षित समुद्रकिनारा म्हणून दिवेआगर चौपाटीची खास ओळख आहे. तब्बल चार किलोमीरच्या अंतरात विस्तीर्ण समुद्रकिनारा अस येथील वैशिष्ठ आहे. पर्यटनाच्या मुलभूत सुविधांमध्ये आपला ठसा उमटवीत, येथील नारळी-पोफळीच्या बागा, रुपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि फेसाळणाऱ्या लाटा हे सर्व काही पर्यटकांना आकर्षित करत आहेत. यावर्षी दिवाळी निमित्त सात दिवसात आठ हजार सहाशे छप्पन वाहनांची नोंद झाली आहे. यातून जवळजवळ लाखाहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे.

येथील हॉटेल्स व होमस्टे मिळून तीनशे सतेचाळीस ठिकाणी राहण्याची सोय आहे. मात्र, यावेळी एवढ्या गर्दीपुढे या देखील अपुऱ्या पडल्या आहेत. पर्यटकांच्या हाऊस फुल गर्दीने अनेक स्टॉल धारक तसेच गृहिणींच्या हाताला काम मिळाले आहे. परिसरातील अनेक व्यवसायिकांना या दिवाळीत रोजगाराची संधी मिळाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पर्यटनात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वांना चांगल्या पद्धतीचा व्यवसाय मिळाला आहे.

सिद्धेश कोजबे, दिवेआगर सरपंच.
Exit mobile version