। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही रायगड जिल्ह्यातील आदिवासी वाड्या मुलभूत सोयी सुविधांपासून कोसो दूर आहेत. एकीकडे रायगड जिल्हा प्रशासनाकडून कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत आदिवासी विकासाच्या वल्गना केल्या जात आहेत. मात्र रायगड जिल्ह्यातील आदिवासी वाड्यांवरील नागरिक रस्ता, वीज, शुद्ध पाणी, शिक्षण, रोजगार यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांसाठी मंगळवार (दि.21) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन या संस्थांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे.
पेण तालुक्यातील वडमालवाडी, तांबडी, उंबरमाळ, केळीचीवाडी, काजूचीवाडी, खऊसावाडी तसेच खालापूरमधील करंबेळी ठाकूरवाडी, खडई धनगरवाडा पनवेलमधील कोरलवाडी आणि टोकाचीवाडी या वाड्यांवर अनेक सोयी सुविधांची वानवा आहे. शासन दरबारी निवेदने देऊनही आश्वासनांचा पलीकडे हाती काहीच लागले नाही. यामुळे या आदिवासी वाड्यांवरील नागरिक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन या संघटनांच्या नेतृत्वाखाली 17 आदिवासी प्रतिनिधींनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या प्रतिनिधींना पाठिंबा देण्यासाठी सुमारे एक हजार आदिवासी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत उपोषणात सामील झाले. यावेळी वकीलांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषणाला आपला पाठिंबा दिला.
आदिवासीं वाड्यावर मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून आदिवासींच्या हक्कांसाठी लढणार्या ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन या संघटनांच्या नेतृत्वाखाली संतोष ठाकूर, अॅड.सिध्दार्थ इंगळे, सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील, सुनील यशवंत वाघमारे, संतोष घाटे, नर्मदा तुळशीदास वाघे,अनिता संतोष वाघे, रेश्मा शत्रुघन हिलम, रंजना राजू वाघे, रविता दिलीप वाघे, आशा मंगेश सवार, गुलाबाई परशुराम वाघे, पुष्पा रामा वाघे, गंगू पांडू वाघे, मनीषा रवी वाघे, शारदा संजय वाघे यांच्यासह आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.
आदिवासी समाजाच्या मागण्या
पेण तालुक्यातील तथाकथित आय.एस.ओ. ग्रुप ग्रामपंचायत दूश्मी- खारपाडा हद्दितील वडमालवाडीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावी व रस्ता करून द्यावा. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानापासून वंचित असलेल्या तांबडी, उंबरमाळ, केळीचीवाडी, काजूचीवाडी, खऊसावाडीची स्वतंत्र आदिवासी ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी व त्यांना तात्काळ नागरी सुविधा पुरवण्यात यावे. खालापूर तालुक्यातील खरीवली ग्रामपंचायत हद्दतील करंबेळी ठाकूरवाडी, खडई धनगरवाडा आणि पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आणि टोकाचीवाडी या आदिवासी वाड्यांना रस्ता व पाण्यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्याच्या याव्यात.