। ठाणे । प्रतिनिधी ।
बदलापुरात नियंत्रण सुटलेल्या एका भरधाव ट्रकने 3 ते 4 वाहनांना धडक दिली. हा अपघात शनिवारी (दि. 02) सकाळच्या सुमारास घडला असून यात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 3 ते 4 जण जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे.
बदलापूरच्या वालीवली गावाजवळ एरंजाडच्या दिशेने लाद्या भरलेला एक मालवाहू आयशर ट्रक उतारावरून भरधाव वेगात आला. उतारावर काही अंतरावर येताच या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने एका कार आणि रिक्षासह 3 ते 4 वाहनांना जोरदार धडक दिली. याचवेळी रस्त्यावर चालणाऱ्या आणि उभ्या असलेल्या पादचाऱ्यांनाही या ट्रकने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यानंतर हा ट्रक एका झाडावर जाऊन धडकला. या अपघातात एका महिलेसह रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन पळून गेला.
या घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.







