। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील पाण्याचे स्रोत हे खूप कमी होत आहेत. त्यात एमआयडीसीचे मध्यम आकाराचे रानसई धरण आणि जलसंपदा विभागाचे पुनाडे धरण हे दोनच पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. तसेच, तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व नागरीकरण सुरू आहे. त्यामुळे सद्य स्थितीत दररोज 50 ते 60 एमएलडी पाण्याची गरज भासते. मात्र, रानसई धरण आणि पुनाडे धरणाची क्षमता तेवढी नाही. त्यामुळे हीच परिस्थिती राहिली तर उरणकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तरी तालुक्यातील जनतेला पाणी पुरवठा करणार्या रानसई व पुनाडे धरणांची क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील ओएनजीसी, जेएनपीटी, बीपीसीएल यासारखे मोठंमोठे प्रकल्प आणि जेएनपीटीच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या गोदामांमुळे या परिसरात नोकर्यांच्या अनुषंगाने नागरीकरणदेखील झपाट्याने वाढत आहे. मागील वर्षीपासून उरण तालुक्यात रेल्वे लोकलदेखील सुरू झाली आहे. न्हावा-शिवडी अटल सेतू यामुळे मुंबई थेट उरण तालुक्याशी जोडली गेली आहे. या वाढत्या नागरीकरण व औद्योगिकी करणासाठी लागणार्या पाण्यासाठी मात्र तालुक्यातील नागरिकांना दुसर्या तालुक्यांवर अवलंबून राहावे लागत आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील नागरिकांवर नवीन पाण्याचे स्रोत शोधण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
सध्या उरणकरांना तालुक्यातील रानसई व पुनाडे या दोन धरणांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे तो कमी पडत आहे. त्यामुळे स्थानिकांना अतिरिक्त पाण्याची गरज भासत असून पेण तालुक्यातील हेटवणे धरणावर अवलंबून राहावे लागत आहे. तरी, उरणचे आमदार बालदी यांना सात वर्षाचा प्रदीर्घ कालावधी होऊनदेखील उरणच्या आमसभेत उरणकरांवर ओढावणार्या पाणीटंचाई संदर्भात कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर येथील जनता नाराज असून यावर जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
तीन ते चार महिने पुरेल एवढाच पाणीपुरवठा
रानसई धरणाची पाणीसाठा साठवण्याची क्षमता 10 एमसीएम एवढी आहे. तर, पुनाडे धरणाची क्षमता जेमतेम 1.75 एमसीएम एवढी आहे. या दोन धरणांच्या पाणी साठ्यावर अवलंबून राहिल्यास तालुक्याला फक्त 3 ते 4 महिनेच पाणीपुरवठा होऊ शकेल एवढेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी सिडकोचे हेटवणे धरण आणि एमजेपीचे बारवी धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.