आ. विजय वडेट्टीवार यांचा सवाल
। मुंबई । प्रतिनिधी ।
गेल्या काही दिवसांपासून पोलीस आणि सीआयडी ज्याचा शोध घेत होते तो वाल्मिक कराड अखेर शरण आला आहे. स्वत:च्या गाडीतून तो पुण्यातील सीआयडी मुख्यालयात हजर झाला होता. तिथे त्याची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, वाल्मिक कराड शरण आल्याने पोलीस आणि सीआयडीच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तसेच, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही एक सोशल मिडीयावर पोस्ट करत पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केले? असा सवाल उपस्थित केला आहे.
खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही 22 दिवस पोलिस व सीआयडी वाल्मिक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही. इतके दिवस वाल्मिक कराडला लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून तो शरण आला, या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष बघता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडपड करणार्या शक्तींनी शरणागतीचे आदेश दिले आहेत का? या वाल्मिक कराडची हिंमत तर इतकी की शरण होण्याआधी व्हिडिओ पोस्ट करतो आणि स्वतःला क्लिनचीट देतो, यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जे कर्तृत्व दाखवले आहे ते पाहता पोलीस, सीआयडी निष्पक्ष चौकशी करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली पाहिजे आणि ही चौकशी बीडच्या बाहेर झाली पाहिजे म्हणजे कोणीही दबाव टाकणार नाही, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.