तहान भागवण्यासाठी बोटीने पाणीपुरवठा
| उरण | वार्ताहर |
घारापुरी बेटावरील तीन गावांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बेटावर पाणीपुरवठा करणार्या एकमेव धरणाच्या पाण्याची पातळी डिसेंबरमध्येच खाली गेली, तेव्हापासूनच पाणीटंचाईचे संकट ओढावले असून, वाढत्या उष्म्यामुळे स्थिती आणखीन बिकट झाली आहे. पर्यटक, बेटावरील रहिवाशांची तहान भागवण्यासाठी सध्या समुद्रमार्गे इतर ठिकाणांहून बोटीतून पाणीपुरवठा करण्यास ग्रामपंचायतीने सुरुवात केली आहे.
जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर राजबंदर, मोराबंदर, शेतबंदर अशी तीन गावे आहेत. जगप्रसिद्ध कोरीव लेण्या पाहण्यासाठी देशी-विदेशातून वर्षभर लाखो पर्यटक येतात. पर्यटन व्यवसायावर आधारित बेटावर स्थानिकांचे कॅन्टीन, रेस्टॉरंट आदी लघुउद्योग आहेत. या सर्वांना पाणीपुरवठा करणारे जुने एकमेव धरण बेटावर आहे. धरणात साठलेले पाणी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज येणार्या हजारो पर्यटकांची तहान भागवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत पुरवले जाते. दरवर्षी धरणात मेअखेरपर्यंत पाणीसाठा असतो. मात्र, यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाला, त्यात उष्मालाटेमुळे साठा कमी झाला आहे. धरणातील गाळ अनेक वर्षांपासून काढला न गेल्याने साठवण क्षमताही कमी झाली आहे. नळाद्वारे गढूळ पाणी येत असल्याने ग्रामपंचायतीने धरणातून पाणीपुरवठा बंद केला आहे. डिसेंबरमध्येच धरणाची पातळी खालावल्याने जानेवारीपासून बेटावरील नागरिकांना पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. घारापुरी बेटावर टँकरने पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने समुद्रमार्गे बोटीने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय नाही.
बेटाजवळच्या बुचर आयलॅण्डवरून हे पाणी आणले जात आहे. दिवसाआड जवळपास 200 ड्रम पाणी बोटीतून आणले जाते तसेच गावातील विहिरीचे पाणी नळाद्वारे ग्रामस्थांना पुरवले जाते, मात्र ते पुरेसे नसल्यामुळे ग्रामस्थांना बाहेरील पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. घारापुरी बेटावरील धरण आटले आहे. नळाद्वारे गढूळ पाणी येत असल्याने धरणातून पाणीपुरवठा बंद केला आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीतून काही ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो, मात्र तो पुरेसा नसल्याने बुचर आयलॅण्डवरून बोटीने पाणी आणून दिवसाआड पुरवले जाते. धरणातील गाळ काढल्यास साठवण क्षमता वाढेल. सरकारने बोटीतून पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी घारापुरी उपसरपंच बळिराम ठाकूर यांनी केली आहे.