टंचाई निवारण्यासाठी 35.65 लाखाचा निधी
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्याची गावे हि दुर्गम भागात विखुरली गेली असल्याने आणि डोंगर भागात गावे वसली असल्याने डोंगरभागामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य नेहमी जाणवत असते. त्यात तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यात पाणीटंचाई जाणवू लागली असून पिण्याचे पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दरम्यान, तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाने पाणीटंचाई कृती आरखडा तयार केला आहे. त्यात तालुक्यातील 18 गावे आणि 57 आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त जाहीर करण्यात आल्या आहेत.
तालुक्यातील उल्हास नदी वगळता अन्य नद्या उन्हळ्यात कोरड्या पडतात. त्यामुळे दरवर्षी मार्च महिना सुरु झाला कि, पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाकडून पाणीटंचाई कृती आरखडा तयार केला जात. त्या कृती आराखड्यानुसार पाणीटंचाई निवारण्यासाठी विंधन विहिरी खोदणे, विहिरींची दुरुस्ती करणे आणि ट्रँकरने पाणीपुरवठा करणे आदी कामे केली जातात. यावर्षी कर्जत तालुक्यात 18 गावे आणि 57 आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई असून तेथे ट्रँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाल्यावर ट्रँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने 35 लाख 65 हजाराचा निधीची तरतूद केली आहे.
मोग्रज, पिंगळस, धामणी, खानंद, अँभेरपाडा, मोहोपाडा, भोपळेवाडी, सुतारपाडा, गरुडपाडा, अंथराट वरेडी, खांडस, ओलमण, चेवणे, नांदगाव, ढाक, तुंगी, पेठ आणि अंथराट वरेडी या 18 गावातील नळपाणी योजना आणि तेथील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन या सर्व गावांचा समावेश पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये करण्यात आला आहे. तालुक्यातील आनंदवाडी, भक्ताचीवाडी, भल्याचीवाडी, पादिरवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी,जांभूळवाडी, बांगरवाडी, पेटारवाडी, काटेवाडी, चाफेवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, मोरेवाडी,ताडवाडी, बनाचीवाडी, बेलाचीवाडी, भागूची वाडी दोन्ही, मेंगाळवाडी, चिमटेवाडी, विठ्ठल वाडी, तेलंग वाडी, किरवली ठाकूरवाडी, सावरगाव ठाकूरवाडी, हर्याचीवाडी, विकासवाडी, आषाने ठाकूरवाडी, नागेवाडी, जांभुलवाडी वारे, बोरीचीवाडी कळंब, चिंचवाडी, मिरचुलवाडी, काळ्याची वाडी, पाली धनगर वाडी, आसलवाडी, नाण्याचा माल, आसल धनगरवाडा, सागाचीवाडी, भूतीवलीवाडी, धामणदांड, ठोंबरवाडी, कळकराई, बेकरे वाडी, माणगाव वाडी, स्टेशन ठाकूरवाडी, नवसूचीवाडी, खाड्याचा पाडा मधली वाडी, चाहूची वाडी, दामत कातकरी वाडी आदी ठिकाणी पाणीटंचाईची स्थिती मार्च पासून उद्भवणार आहे.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने ट्रॅकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ट्रॅकर सुरू केले जाणार आहेत. मात्र ट्रॅकरने पाणीटंचाईग्रस्त गावे-वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी यावर्षी 24.60 लाखाची तरतूद केली आहे. त्याचवेळी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याआधी चार गावे आणि 14 आदिवासी वाड्यांमध्ये बोअरवेल खोदल्या जाणार आहेत. त्यात चेवणे, बोण्डेशेत, खरवंडी आणि पोटल कळंबेपाडा तर तालुक्यातील फोंडेवाडी, बेलदारवाडी, बनाचीवाडी, खरवंडी आदिवासीवाडी, भिवपुरी कातकरीवाडी, स्टेशन ठाकूरवाडी, मोरेवाडी, लाखाचीवाडी, ताडवाडी, ऐनवाडी, इंजिवली वरई, भोम्बलवाडी आणि धाकटे वेणगाव येथे विंधण विहिरी खोदक्या जाणार आहेत. त्याचवेळी तालुक्यातील जुन्या 18 विंधन विहिरी यांची दुरुस्ती देखील केली जाणार असून त्यासाठी 11 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.