। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या पर्यटनस्थळी पर्यावरण पूरक ई-रिक्षा चालविल्या जात आहेत. या ई-रिक्षा माथेरान मधील अमानवी प्रथा बंद करण्यासाठी हात रिक्षा चालकांना ई-रिक्षा चालवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, अजूनही 74 हात रिक्षा चालकांना ई-रिक्षा चालवण्याची परवानगी दिलेली नाही. तसेच, त्या सर्व हात रिक्षा चालकांना ई-रिक्षा चालवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी माथेरानमधील महिलांनी रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
यावेळी, साधारण 200 महिलांच्या सह्यांचे निवेदन घेऊन या महिला जिल्हाधिकारी यांना भेटायला आल्या होत्या. यावेळी, निवृत्त मुख्याध्यापिका कल्पना पाटील, वर्षा शिंदे, अर्चना बिरामने, रिझवाना शेख, सुजाता जाधव आणि सुहासिनी दाभेकर यांनी सह्यांचे निवेदन रायगड जिल्हाधिकारी उपलब्ध नसल्याने निवासी उपजिल्हाधिकारी यांना सादर केले आहे. त्या निवेदनात माथेरान मधील सर्व हात रिक्षा चालकांना ई- रिक्षा त्वरित सुरू करणे, प्रवासी आणि पर्यटक तसेच शहरातील नागरिक आणि विद्यार्थी यांची गैरसोय होऊ नये यासाठी माथेरान शहरात 24 तास ई-रिक्षाची सेवा सुरू ठेवावी, माथेरान शहरातील अर्धवट असलेल्या क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते कामकाज त्वरित सुरु करावे, माथेरान सनियंत्रण समितीमध्ये माथेरान मधील एक प्रतिनिधी असावा. या सर्व मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी पुढील आठवड्यात सनियंत्रण समितीची सभा होणार आहे, त्यात हे विषय समाविष्ट करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.