आंबेत पुलाच्या कामात टीएनटी कंपनीचा हलगर्जीपणा
| आंबेत | वार्ताहर |
गेल्या तीन वर्षांपासून कमकुवत आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण वाहतुकीस बंद असलेल्या आंबेत सावित्री पुलाचे काम हे टीएनटी कंपनीकडून सुरु आहे. या कंपनीकडून सद्यःस्थितीत पायलिंग करण्याचे काम सुरु आहे. मात्र, या पुलाच्या कामात कोणतीच कामगार वर्गामध्ये सुरक्षितता दिसून येत नाही. उलट, या कामगारांना अक्षरशः आपला जीव धोक्यात टाकून ही कंपनी काम करण्यास भाग पाडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता कंपनीचे साईड इंजिनियर आणि सुपरवायझर यांनीदेखील आमच्या प्रतिनिधीजवळ बोलण्यास टाळाटाळ केली. एकीकडे तीन वर्षे बंद असलेल्या या पुलामुळे आंबेत परिसरासह गोरेगाव, म्हाप्रल बाजारपेठ ओस पडल्याचे चित्र आहे. पुलाच्या कामात सद्यःस्थितीत पूल सुरू होण्याची कोणतीच चिन्हे अद्याप दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.