| पनवेल । वार्ताहर ।
स्वच्छ भारत आणि माझी वसुंधरा अंतर्गत पनवेल महापालिकेने वडाळे तलाव बल्लाळेश्वर विसर्जन घाट येथे इंडियन कोस्टल गार्ड, शालेय विद्यार्थी, महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागातून शून्य कचरा मोहीम राबवली. शून्य कचरा मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.
आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत इंडियन कोस्टल गार्डचे स्वयंसेवक, नागरिक, महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी वडाळे तलावाच्या विसर्जन घाटाची साफसफाई केली. ‘स्वच्छता ही सेवा’ या ब्रीदवाक्यासह सफाई मोहिमेत तलावातील सर्व प्लास्टिक व कचरा जमा करण्यात आला.
महापालिका क्षेत्रात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022-23 या काळासाठी प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. शहराच्या स्वच्छतेवर महापालिकेने विशेष लक्ष दिले आहे. विशेषतः स्वच्छता हा नागरिकांच्या सवयीचा भाग व्हावा, लोकांमध्ये जनजागृती वाढावी, यासाठी पालिका विविध उपक्रम राबवत आहे. शून्य कचरा उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे. शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी पालिकेच्यावतीने विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी सण, समारंभ साजरे करताना प्लास्टिक वस्तू टाळून, पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा; जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण होईल. जास्तीचा कचरा निर्माण होणार नाही, याबाबत विद्यार्थी, नागरिकांमध्ये जनजागृती केली. नागरिकांनी स्वच्छतेविषयी जागरूक राहून शून्य कचरा उपक्रम राबवावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले.