| धाटाव | प्रतिनिधी |
रोह्यातील अष्टमी नाक्यावर रोहा शहराकडे जाणाऱ्या वळणावर मोठंमोठे बॅनर व फ्लेक्स उभारण्यात आले होते. परंतु, ते अपघातास निमंत्रण देणारे ठरत होते. त्यामुळे अष्टमीकरांना येथून जीव मुठीत घेत मार्ग काढावा लागत होता. प्रशासनाच्या या दुर्लक्षाबाबत प्रवासीवर्गातून संताप व्यक्त होत होता. त्याची दखल घेत सोमवारी (दि.27) पहाटे येथील सर्व धोकादायक, अनधिकृत बॅनर नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी हटवली आहेत. त्यामुळे कित्येक दिवसांनी या नाक्याने मोकळा श्वास घेतला असल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले. यावेळी जसे जनरेट्यामुळे प्रशासन जागे झाले, तसेच जागृत व कर्तव्यदक्ष रहात सतत हा संपूर्ण परिसर बॅनरमुक्त ठेवावा, अशी माफक अपेक्षा त्रस्त नागरिकांमधून होत आहे.







