41 कोटींच्या फ्लोटिंग जेट्टीलाही ब्रेक
| मुरुड | प्रतिनिधी |
कोकण पर्यटनाला नवे पंख देणारी काशीद जेट्टी अद्यापही रखडलेलीच आहे. 2019 मध्ये 112.46 कोटींच्या भव्य प्रकल्पाला मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. आता 41 कोटींच्या फ्लोटिंग जेट्टीचा प्रस्ताव मंजूर होऊन टेंडरही निघाले, तरी काम सुरू होत नसल्याने पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांत संताप वाढत आहे.
मुरुड तालुक्यातील काशीद हे कोकणातील एक प्रमुख पर्यटन केंद्र असून, दरवर्षी सात लाखांहून अधिक पर्यटक येथे भेट देतात. मुंबईसह राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी काशीद समुद्रकिनारा आकर्षणाचे केंद्र आहे. या पार्श्वभूमीवर काशीदला मुंबईशी जलमार्गाने थेट जोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 23 जानेवारी 2019 रोजी 112.46 कोटी रुपयांच्या जेट्टी प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली होती. मात्र, तब्बल सात वर्षे उलटूनही हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरलेला नाही.
सध्या मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांना मांडवा मार्गे काशीद गाठण्यासाठी सुमारे तीन तासांचा प्रवास करावा लागतो. प्रस्तावित जेटीमुळे हे अंतर जलमार्गाने अवघ्या दोन तासांत पार करता येणार होते. त्यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. जेट्टीचा ब्रेकवॉटर वॉल पूर्ण होऊन वर्ष उलटले असतानाही पुढील काम ठप्प आहे.
दरम्यान, नव्याने 41 कोटी रुपयांच्या फ्लोटिंग जेटीला मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. तरीही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवाळी हंगाम तोंडावर असताना स्थानिक व्यावसायिक मोठ्या अपेक्षेने जेट्टीच्या कामाकडे पाहात आहेत. जेट्टी सुरू झाल्यास मुंबईहून पर्यटकांचा ओघ वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
ही जेट्टी दुहेरी उद्देशाने उभारण्यात येणार असून, प्रवासी वाहतूक आणि रो-रो बोट सेवा सुरू करण्याचा मानस आहे. रो-रो सेवेमुळे एकावेळी सुमारे 100 कार आणि 300 प्रवाशांची वाहतूक शक्य होणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळून काशीद, मुरुड, नागाव परिसरात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
काशीद जेट्टीमुळे पुणे, कोल्हापूर, सांगलीसारख्या भागांतील पर्यटक काशीदमार्गे रो-रो सेवेद्वारे मुंबईपर्यंत प्रवास करू शकतील. त्यामुळे पर्यटनासोबतच वाहतूक व्यवस्थेलाही नवे पर्याय उपलब्ध होणार आहेत. मात्र, इतक्या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत प्रशासनाची संथ गती आणि अकार्यक्षमता यामुळे ‘जेट्टी सुरू होणार कधी?’ हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी तातडीने कामाला सुरुवात करण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला जात आहे.
पर्यटनाला चालना
काशीद जेट्टी सुरू झाल्यास केवळ देशांतर्गतच नव्हे, तर परदेशी पर्यटकांनाही कोकणाकडे आकर्षित करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. मुंबईहून थेट जलमार्ग उपलब्ध झाल्यास पर्यटनाचा चेहरामोहरा बदलू शकतो. मात्र, सध्या हा प्रकल्प केवळ कागदावरच अडकून पडल्याचे चित्र आहे.
मुरुड-काशीद-नागाव परिसरातील समुद्रकिनारे कोकणातील सर्वात सुंदर आहेत. मात्र, खराब रस्त्यांमुळे येथे येताना मोठा त्रास सहन करावा लागतो. जेट्टी लवकर सुरू झाल्यास पर्यटकांना स्वतःच्या वाहनांसह समुद्रमार्गे प्रवास करता येईल आणि पर्यटनाचा आनंद द्विगुणित होईल.
हेमंत गांधी,
पर्यटक






