कर्मचाऱ्यांची कुचंबणा; शहरातील पाणीप्रश्नाचे स्वरूप अधोरेखित
| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरातील पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना आता त्याची झळ थेट उरण नगरपालिकेलाच बसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेले दोन दिवस उरण नगरपालिका कार्यालयात पाणीच नसल्याने कर्मचाऱ्यांची मोठी कुचंबणा होत असून, महिला कर्मचाऱ्यांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
नगरपालिका कार्यालयातील वॉशरूममध्येही थेंबभर पाणी नसल्याने कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. पाणीअभावी दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून, स्वच्छतेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांची जबाबदारी असलेल्या नगरपालिकेच्या कार्यालयातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे, गुरुवारी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी शहरातील पाणीटंचाईच्या समस्येबाबत सभागृहाने ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली होती. मात्र, या विषयावर भाजपच्या नगरसेवकांनी विरोधाची भूमिका घेतल्याची चर्चा होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत नगरपालिकेच्या कार्यालयातच पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“नगरपालिका कार्यालयातच पाणी नसेल, तर शहरातील नागरिकांची परिस्थिती किती बिकट असेल याची कल्पनाही करवत नाही,“ अशी प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृहाच्या वापरासाठी मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.
उरण नगरपालिकेच्या कार्यालयातील ही परिस्थिती शहरातील पाणीप्रश्नाचे गंभीर स्वरूप अधोरेखित करणारी असून, यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा संताप आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
पावसाने दडी मारल्याने उरण शहरासह परिसरातील पाणीटंचाई अधिकच तीव्र होत आहे. अनेक भागांत नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असून, प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







