| पाली/गोमाशी | वार्ताहर |
आधुनिक युगात ज्ञानाची कवाडे वेगवेगळ्या माध्यमातून खुली झाली आहेत. मात्र अनेक अडथळे व संसाधनांचा अभावामुळे ती सर्वांपर्यंत पोहचत नाहीत. पण ज्ञानसागराने भरलेल्या, सहज कोठेही उपलब्ध होऊ शकणाऱ्या पुस्तकांना स्थळ काळाचे बंधन नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच वाचनसंस्कृती टिकावी, ज्ञानाची कवाडे आणखी विस्तारावीत व सर्वांपर्यंत पुस्तके सहज पोहचावी यासाठी वाढदिवस, समारंभ, कार्यक्रम आदी ठिकाणी फुल, पुष्पगुच्छ याऐवजी पुस्तके भेट देण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
हार, फुले, पुष्पगुच्छ कालांतराने सुकून जातात. मात्र त्या ऐवजी पुस्तके दिल्यास ती इतरांचे आयुष्य आनंदाने फुलवून टाकतात. त्यांचे विचार समृद्ध करतात. सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध कवी व साहित्यिक उमेश जाधव यांनी सांगितले की, लोक पुस्तक वाचनाकडे वळत आहेत. वाचनासाठी खास वेळ देखील काढत आहेत. चांगल्या पुस्तकाची चिकित्सा करुन आपले मतही मांडत आहेत. गाव खेड्यात देखील वाचन संस्कृती बहरत आहे. कोणत्याही कार्यक्रमास गेल्यास लोक आवर्जून पुस्तक देतात. मीही अनेकांना माझा कविता संग्रह भेट देतो असे उमेश म्हणाले.
जिल्ह्यातील शिवऋण प्रतिष्ठान महाराष्ट्रचे उपाध्यक्ष केतन म्हसके यांनी सांगितले की, खेड्यापाड्यातील विद्यार्थी व तरुण यांना वाचनाची सवय लागावी. तसेच त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे, अवांतर पुस्तक वाचनाकडे त्यांनी वळावे. यासाठी संस्थेच्या, शासनाच्या तसेच दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून गावागावांमध्ये ग्रंथालय उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे गावागावांत वाचन संस्कृती वृद्धिंगत होत आहे. पालीतील शिक्षक मोरेश्वर कांबळे यांनी सांगितले की, वाढदिवस, समारंभ, कार्यक्रम व स्नेहसंमेलन अशा विविध ठिकाणी पुस्तके देण्याचा प्रघात वाढताना दिसत आहे. शिवाय अनेक लोक व संस्था शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके भेट देतात. ही बाब निश्चित स्वागतार्ह आहे. यातून समाज अधिक सजग व प्रगतिशील होण्यास गती मिळेल.
गेल्या अनेक वर्षापासून वाढदिवसानिमित्त, पाहुण्याच्या स्वागतावेळी किंवा विशेष कार्यक्रमावेळी पुस्तके भेट देत आहे. समोरून मला सुद्धा पुस्तके भेट मिळतात. पुस्तके वाचली पाहिजेत. जसा वेळ मिळेल तसे वाचत राहिले पाहिजे.
सागर शिंदे, प्राथमिक शिक्षक, राजीप वऱ्हाड शाळा