| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
क्रिकेटच्या विश्वात सोमवारी श्रीलंका-बांगलादेश सामन्यादरम्यान खळबळजनक घटना घडली. फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज येण्यास उशीर झाल्याने त्याला बाद देण्यात आले. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजबरोबर हा प्रकार घडला. याबरोबर या नियमाची चर्चा सगळीकडे झाली. क्रिकेटमध्ये असेच काही नियम आहेत, जे खेळाडूंनाच नाही तर प्रेक्षकांनाही भंडावून सोडतात. सोमवारच्या सामन्यानंतर पुन्हा यावर जोरदार चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे टाईम आऊट सोडा, त्या नियमांकडे आता क्रिकेटजगतातून बोट दाखविले जात आहे. त्यामुळे क्रिकेटला यापुढे जिवंत ठेवायचे असेल, तर या नियमांमध्ये बदल होणे अपेक्षित असल्याचे चाहत्यांकडून बोलले जात आहे.
काय आहेत नियम.. 1. क्रिकेटमध्ये स्टम्पवरील बेल्सची महत्त्वाची भूमिका असते. आता तर बेल्स अस्थिर झाली की सेन्सरमुळे लाल लाईट पेटते. यामुळे यष्टीरक्षक किंवा क्षेत्ररक्षकाने स्टम्पला स्पर्श केला आणि बेल्स त्यापासून वेगळ्या होत असतानाचे अचूक टायमिंग ओळखता येते. परंतु, नियमानुसार बेल्सशिवायही सामना खेळला जाऊ शकतो. वेस्ट इंडिज आणि अफगानिस्तानमध्ये अशी मॅच झाली होती. वेगवान हवेमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. 2. क्रिकेटमध्ये असा नियम आहे की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने फलंदाजाविरुद्ध अपील केले नाही, तर तो बाद झाला तरी त्याला आऊट दिले जात नाही. 3. क्रिकेटच्या नियमांनुसार, जर एखाद्या फलंदाजाच्या हातात बॅट नसेल आणि चेंडू त्या हाताच्या ग्लोव्हला स्पर्श करून क्षेत्ररक्षकाकडे गेला व झेल टिपला तर त्याला आऊट दिले जात नाही. त्याने बॅट पकडलेल्या हाताच्या ग्लोव्हज्ला चेंडू आदळला तरच त्याला बाद केले जाईल. 2014 मध्ये श्रीलंकेच्या रंगना हेराथसोबत एकदा असे घडले होते. 4. हेल्मेटमुळे खेळाडूंना संरक्षण मिळते. परंतु, काही वेळा यामुळे संघाचं नुकसानही होते. वेगवान गोलंदाजीवेळी मैदानावर यष्टीरक्षक हेल्मेट ठेवतो. त्याला चेंडू लागल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला दंड म्हणून 5 रन्स दिले जातात. 5. मैदानावर चेंडूला अडथळा निर्माण झाला तर दंड म्हणून 5 धावा दिल्या जातात, पण हवेत असेच काही घडले तर तो चेंडू डेड बॉल म्हणून घोषित केला जातो. किंबहुना, फलंदाज जेव्हा एरियल शॉट खेळतो, तेव्हा चेंडू स्पायडर कॅमवर आदळतो असे अनेकवेळा दिसून आले आहे. अशा स्थितीत पंच त्या चेंडूला डेड समजतात.