सुशोभीकरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीच्या राजमाता जिजामाता तलावाचे सुशोभीकरण केले जात आहे. या ठिकाणी तलावाच्या भिंतीला 20 जून रोजी झालेल्या जोरदार पावसाने भगदाड पडले होते. दरम्यान, त्या भगदाड पडलेल्या भिंतीची दुरुस्ती जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तात्काळ करून घेतली आहे. दरम्यान, राजमाता जिजामाता तलावाच्या भिंतीला पडलेले भगदाड बुजविण्यात आल्याने स्थानिकांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कौतुक केले आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतमध्ये प्रादेशिक पर्यटन विभागातून ग्रामपंचायतीच्या मालकीच्या राजमाता जिजामाता तलावात सुशोभीकरण आणि मजबुतीकरण केले जात आहे. त्या माध्यमातून तलावातील पाण्याच्या तळाशी असलेल्या भिंतीला प्लास्टर तसेच तलावाच्या पाण्याच्या वरच्या भागात संरक्षण भिंत व अन्य कामे सुरु आहेत. 20 जून रोजी नेरळ परिसरात साधारण दोन तास पाऊस पडला आणि त्या पावसात तलावातील भिंतीचे प्लास्टर कोसळले. सोबत तलावाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले. या भगदाडामुळे नेरळ ग्रामपंचायतचे मालकीच्या राजमाता जिजामाता तलावाच्या सुशोभीकरण कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. साधारण दोन कोटी खर्चून राजमाता जिजामाता तलावाचे सुशोभीकरण केले जात आहेत.
त्या भगदाडाबद्दल माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियानात निलेश खिल्लारे यांनी पाहणी करून ठेकेदाराला निर्देश दिले जातील, असे आश्वासन नेरळ ग्रामस्थांना दिले होते.त्यानंतर उप अभियंता खिल्लारे यांनी पाहणी केल्यावर त्या भिंतीचे भगदाड बुजवून नव्याने बांधकाम करण्याचे निर्देश ठेकेदाराला दिले. ठेकेदाराने ते भगदाड बुजवून घेतले त्याचवेळी तलावाच्या वरच्या भागात देखील नव्याने सिमेंटच्या साहाय्याने पीसीसी करून घेतले आहे. जिल्हा परिषदेने नित्कृष्ट दर्जाच्या कामाबद्दल तात्काळ कारवाई करून नव्याने ते बांधकाम करून घेतल्याने नेरळकरांनी समाधान व्यक्त केले आहे.