। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग ही रायगड जिल्ह्याची राजधानी म्हणून ओळखली जात असून, या राजधानीत सर्व प्रकारची शासकीय कार्यालये, बँका असल्याने रायगड जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून अनेकजण आपल्या विविध कामांसाठी येत असतात. ही कामे आटोपण्यासाठी संपूर्ण दिवस जात असल्याने काहीजण सोबत घरूनच जेवणाचे डबे आणतात, तर काहीजणांना वडापाव खाऊन दिवस काढावा लागत असे. महाराष्ट्र शासनाने ही गैरसोय लक्षात घेऊन अशांसाठी राज्यात शिवभोजन केंद्रे सुरु केले आहे. त्यापैकीच अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सुरभी भोजनालय शिवभोजन केंद्र हे होय.
शासन निर्णयाप्रमाणे सुरभी भोजनालय शिवभोजन केंद्राला गरीब व गरजू लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना 19 व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरु झाले आणि शिवभोजन थाळीची संख्या 100 वरून 250/450 साडेचारशे इतकी वाढविण्यात आली. या व्यतिरिक्त परप्रांतीयांसाठी लॉकडाउनच्या काळात अलिबाग एस.टी. आगार येथे भोजन देण्याचे कार्य देखील संस्थेतर्फे करण्यात आले. 3 जून 2020 रोजी निसर्ग वादळामुळे आलेल्या संकटाच्या आपत्ती सामना करण्यासाठी सुरभी शिवभोजन केंद्रातून एक हजार लोकांना जेवणासह चहा, नाश्ता, पाण्याची सोय करून दिली होती.
या थाळीमध्ये चपाती, भाजी, भात, वरण हे पदार्थ दिले जातात. भोजन घेणार्यांमध्ये सर्वधर्मीय सर्वसामान्यांचा समावेश असून, त्यांच्या सेवेसाठी संस्थेचे चार ते पाच कर्मचारी झटत असतात. 80 ते 90 गरजू पार्सल स्वरूपात सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सध्याच्या लॉकडाऊन काळामध्ये लाभ घेत असतात असेही श्रीमती जेधे यांनी सांगितले.
सुरभी संस्थेतर्फे चालविले जाणारे शिवभोजन केंद्र हे जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील विविध भागातून तसेच इतर जिल्ह्यातूनसुद्धा मीटिंगसाठी येणारे तसेच अन्य कामांसाठी येणारे शिवाय अलिबागच्या परिसरातील लोक शिवभोजनाचा लाभ घेत असतात.
सुप्रिया जेधे, सुरभी संस्थेच्या प्रमुख.
Related