कार पूर्णपणे जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही
। सुकेळी । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी येथील जिंदल कंपनीच्या समोरच राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि.12) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पहावयास मिळाला. चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, वेग्नर कारचालक देविदास अनंत डोंगरे, रा. अंधेरी हे आपल्या ताब्यातील कार क्र. एम.एच. 46 बी. झेड 8819 ही गाडी घेऊन शुभम संतोष तेली रा.पनवेल व रोहीत तेली रा. कल्याण यांच्यासह होळी सणानिमित्त आपल्या कणकवली या गावी जात होते. दरम्यान, नागोठणेच्या पुढे सुकेळी येथील जिंदल कंपनीच्या समोर कार आली असता अचानक इंजिनमधून धूर आल्याचे चालक देविदास डोंगरे यांच्या लक्षात येताच त्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्त्यावर कार उभी केली आणि कारमधील तिघेही जेवढे सामान हातात भेटेले तेवढे घेऊन कारच्या बाहेर पडले. त्यानंतर काही क्षणातच कारने मोठ्या प्रमाणात पेट घेतला.
यावेळी महामार्गावरील वाकण टॅबचे महामार्ग पोलीस संदिप घासे व जनार्दन मेंगाल यांनी तत्काळ जिंदल कंपनीच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे अच्युतानंद, सिक्युरिटी हेड गुलाब सिंग तसेच, त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन काही क्षणातच आग आटोक्यात आणली. पंरतु, सी.एन.जी. कार असल्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्यामुळे संपुर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी करीत आहेत.