| नागोठणे | प्रतिनिधी |
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जवळपास ऑक्टोंबर महिना संपत आला तरी पावसाचा शिडकावा सुरुच होता. पंरतु, चार ते पाच दिवसांपासून सर्वत्र पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण रोहा तालुक्यासह नागोठणे परिसरामध्ये शेतकऱ्यांची भातकापणीची लगबग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परतीच्या पावसाने शेतातील भाताची रोपे ही जमिनीवर आडवी पडुन सर्वत्र विखुरल्यामुळे भातकापणी करतांना मजुरांचे अक्षरशः कंबरडे मोडत आहेत.
भातकापणी करतांना शेतामध्ये पुन्हा नव्याने उगवलेले भाताचे कोंब देखील अडथळे ठरत आहेत. ज्या ठिकाणी भातकापणीसाठी दोन ते तीन दिवस लागायचे त्या ठिकाणी भातकापणी करण्यासाठी आठ ते दहा दिवस लागत आहेत. त्यातच भातकापणीसाठी लागणाऱ्या मजुरांची कमतरता भासत आहे. बहुतांशी आदिवासी मंजुर हे दरवर्षी आप आपल्या शेतीची कामे पुर्ण करुन दुसरीकडे मजुरीसाठी जातात. पंरतु, यावेळी मात्र उशिरापर्यंत सुरू राहीलेल्या पावसामुळे भातकापणीची कामे ही सर्वांचीच एकदमच निघाल्यामुळे मजुरांची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यातुनच जरी मजुरकर मिळाले तरी 500 ते 600 रुपये एका माणसाची मजुरी, दोन वेळचे जेवण व चहा पाण्यासाठी आणखी वेगळे पैसे असा मोठ्या प्रमाणात खर्च शेतकऱ्यांना मजुरांवर करावा लागत आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणारी बी-बीयाणे, मजुरांचा खर्च व परतीच्या पावसाचा बसलेला फटका अशा सर्व गोष्टींचा विचार करता यापुढे शेती करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.







