5,541 जणांवर कारवाई; 55 लाखांचा दंड वसूल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला असून, विशेष मोहिमेत हजारो चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांविरोधात रायगड पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले असून, 29 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 5 हजार 541 चालकांना दणका देण्यात आला आहे. विना हेल्मेट वाहन चालविणे त्यांना महागात पडले असून, त्यांच्याकडून 55 लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात पर्यटनासोबतच औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अलिबागसह विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. तसेच विविध प्रकल्पांमुळे बाहेरील राज्य, जिल्हे व तालुक्यांमधून नागरिक मोठ्या संख्येने येथे येत आहेत. नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने वाहतुकीचा ताणही वाढत आहे.
सध्या दुचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली असून जवळपास प्रत्येक घरात एक तरी दुचाकी असल्याचे चित्र आहे. मात्र वाहतूक नियमांकडे चालकांकडून दुर्लक्ष होत असून, विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत आहे. विना हेल्मेट वाहन चालविल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान 110, तर 2025 मध्ये 104 अशा दोन वर्षांत एकूण 214 जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत 175 अपघातांमध्ये 64 जणांचा मृत्यू झाला असून, 170 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 51 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपघाती मृत्यू रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून 29 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान 5 हजार 541 चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. 2025 मध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत 535, तर 2026 मध्ये जानेवारी ते मार्चपर्यंत 1 हजार 920 चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात महामार्गांसह विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, या कारवाईमुळे बेशिस्त चालकांना चांगलाच धडा मिळाला आहे.
अपघातांची आकडेवारी
2024 मध्ये मृत्यू : 110
2025 मध्ये मृत्यू : 104
दोन वर्षांत मृत्यू : 214
जानेवारी-मार्च 2026 अपघात : 175
मृत्यू : 64
गंभीर जखमी : 170
किरकोळ जखमी : 51
विना हेल्मेट वाहन चालविल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे. 29 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीत 5 हजार 541 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे.
सरिता चव्हाण,
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड






