प्रशासनाचा पाणीपुरवठा संदर्भात भोंगळ कारभार
। नेरळ । प्रतिनिधी ।
शेलू ग्रुप ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष होत असून ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांना सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात पाणीटंचाईला समोरे लागत आहे. ग्रामपंचायतमधील प्रशासन यांच्या चुकीच्या नियोजनामुळे ग्रामस्थ पिण्याच्या पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत.
कर्जत तालुक्यातील झपाट्याने मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असलेल्या शेलू ग्रुप ग्रामपंचायतमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. येथील रहिवाशांना गेल्या ऑगस्ट महिन्यापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाचा पाणीपुरवठा संदर्भात भोंगळ कारभार दिसून येत आहे.
स्थानिक नागरिक रामनाथ निमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या समस्येकडे ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. 28 जानेवारी रोजी लेखी तक्रार देऊनही समस्या कायम होती. तसेच 1 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचात अधिकारी म्हात्रे यांना एसएमएस पाठवून परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली होती. संबंधित कर्मचारी बडे यांना अनेकदा फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी फोन उचलला नाही किंवा प्रतिसाद दिला नाही.
वाढती उष्णता पाहता पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात लागत आहे.दरम्यान वारंवार लेखी तक्रारी आणि टेलीफोनद्वारे संपर्क करूनही पाणी समस्या सुटत नसल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. जर ग्रामपंचायतीने या समस्येकडे जातीने लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत केला नाही, तर वरिष्ठ कार्यालयात हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.







